नांदेड| शहरातील कॅनॉल रोड लगतच्या विविध नगरातील नागरिक अस्वच्छता, अतिक्रमण, असुरक्षितता, अंधार आणि पाणी पुरवठ्यात अनियमितता या गैरसोयींनी त्रस्त झाले आहेत. पण या प्रश्नांबाबतची महानगर पालिकेसह इतर यंत्रणांची अनास्था विकोपास गेल्यामुळे नागरिकांपुढे आता आंदोलनाशिवाय अन्य पर्याय राहिलेला नाही.

कॅनॉल रोडला लागून परवानानगर, स्नेहांकित नगर, स्वागतनगर अशा अनेक वसाहती आहेत या वस्त्यांमध्ये चौकाचौकात कचऱ्याचे ढीग आहेत. महानगरपालिकेची कचरा संकलन यंत्रणा अत्यंत अकार्यक्षम असून क घंटागाडीवरील कर्मचारी रस्त्यावरील कचऱ्याची विल्हेवाट लावत नाहीत. काही ठिकाणी तर घंटागाडीची वाहने फिरकतही नाहीत. कॅनॉलरोडवरही जागोजागी कचरा झाला आहे. या साठलेल्या कच-याची दुर्गंधी पसरत आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या अस्वच्छतेबाबत नागरिकांनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त यांना अनेकदा निवेदनेही दिली आहेत पण आजपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. कॅनॉल रोडचा बराचसा भाग वाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो म्हणून नागरिकांनी वाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनाही याबाबत निवेदन दिले पण त्यांनाही या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.


कॅनॉल रोड चे रुपांतर राज्य महामार्गात करण्यासाठी या रस्त्याचे विकास काम पाटबंधारे खात्याकडे सोपविण्यात आले आहे. या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम झाले असले तरी या रस्त्यावरील पथदिवे गेल्या तीन वर्षांपासून बंद आहेत. याबाबत अनेक वेळा निवेदने देऊनही या रस्त्यावर अजूनही अंधारच आहे. या अंधाराचा फायदा घेऊन चोर वाटमारी करीत आहेत. मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या महिलांचे दागिने हिसकावणे, मोबाईल पळविणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. पण पोलिसांनी याबाबतीत त्रयस्थ दृष्टीकोन स्वीकारला असून कोणतीही कारवाई पोलिसांकडून केली जात नाही.

कॅनॉल रोडवरील अतिक्रमण ही सामान्य नागरिकांची डोकेदुखी ठरली आहे. अतिक्रमण करून काही जणांनी तर या रस्त्यावर अवैध मटणविक्रीही सुरु केली आहे. एक ते दोन वर्षांपूर्वी महानगरपालिकेने मरण विक्रीच्या काही दुकानांना सील लावले होते पण या निर्लज्ज व्यापाऱ्यांनी ते सील तोडून तेथेच पुन्हा मांसविक्री सुरु केली आहे.
पाणी पुरवठ्यात अनियमितता ही तर नांदेडच्या नागरिकांची मोठी डोकेदुखी आहे. गेल्या पाच वर्षांपासून पाणी पुरवठ्याच्या वेळा पाळण्यात आलेल्या नाहीत. काही दिवस दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत होता. आता तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी नांदेड मनपा आयुक्तांनी एका पत्रकारास मुलाखत देतांना सांगितले की, या वर्षी दिवाळीपासून नादेड वासीयांना दररोज पाणी पुरवठा करण्यात येईल. आता दोन वर्षानंतरही पाणी पुरवठा दररोज सोडून दोन दिवसाआडही करण्यात आलेला नाही.हा संताप तीव्र आंदोलनाद्वारे व्यक्त होणार आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे त्वरीत लक्ष घातले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत आहे.

