Chif Minister Fadnavis : दत्त शिखर संस्थानचे महंत मधुसूदनजी भारती महाराज यांना मुख्यमंत्री फडणवीस यांची श्रद्धांजली
अध्यात्म क्षेत्रातील मोठी हानी

मुंबई | माहूर (जि. नांदेड) येथील श्री दत्त शिखर संस्थानच्या गादीचे महंत प.पू. मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती (मालक) महाराज यांना देवाज्ञा झाल्याची बातमी अत्यंत दुःखद असून, त्यांच्या निधनाने अध्यात्म, सेवा आणि परंपरेचा एक मोठा दीपस्तंभ हरपल्याची भावना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.


महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात दत्तभक्ती, धर्मसंवर्धन आणि समाजसेवेसाठी अखंड कार्य केले. त्यांच्या साधेपणातच महानता दडलेली होती. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे असंख्य भक्तांना आध्यात्मिक दिशा मिळाली होती.

माहूर गड व दत्त शिखर संस्थानची गौरवशाली परंपरा त्यांनी अत्यंत निष्ठेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने जपली. त्यांच्या कार्यामुळे संस्थानची ओळख अधिक व्यापक झाली होती. त्यांच्या जाण्याने केवळ संस्थेचेच नव्हे, तर संपूर्ण भक्तपरिवाराचे मोठे नुकसान झाले आहे.


दरम्यान, विविध स्तरांतून महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात असून, परिसरात शोककळा पसरली आहे. “ॐ शांती” या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.




