नांदेड/माहूर | नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत श्री मधुसूदनजी भारती (मालक) महाराज यांना देवाज्ञा झाल्याची बातमी संपूर्ण परिसरासाठी अत्यंत दुःखद ठरली आहे. त्यांच्या निधनाने आध्यात्मिक क्षेत्रातील एक मोठा दीपस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.


या पार्श्वभूमीवर अशोकराव चव्हाण (Ashok Chavan) यांनीही आपल्या भावना व्यक्त करत महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी म्हटले आहे की, “माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत श्री मधुसूदनजी भारती महाराज यांना देवाज्ञा झाल्याची बातमी मन सुन्न करणारी आहे. त्यांच्या जाण्याने आध्यात्मिक क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला आहे. गेल्याच आठवड्यात मी त्यांचे दर्शन घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती.”


पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “महाराजांनी आपल्या जीवनकार्यात केवळ भक्तीचा मार्ग दाखवला नाही, तर सेवा व मानवतेचीही शिकवण दिली. माहूर गडावरील दत्त शिखर संस्थानची आध्यात्मिक परंपरा त्यांनी अत्यंत प्रभावी व शिस्तबद्ध पद्धतीने जपली.”



“महाराजांच्या रूपात एक थोर विचारवंत आणि मार्गदर्शक हरपले असून, त्यांचे कार्य आणि शिकवण भक्तांच्या माध्यमातून सदैव अजरामर राहील,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, महाराजांच्या निधनाने माहूरसह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात शोककळा पसरली असून, विविध स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.







