लोहा| स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, नांदेड कार्यालयाच्या वतीने लोहा तालुक्यातील वडेपुरी येथे ‘उत्सव स्वातंत्र्याचा’ या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा रॅली, ‘कॅच द रेन’ अभियानांतर्गत विविध स्पर्धा, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शेतकऱ्यांसाठी कृषी मार्गदर्शन व चर्चासत्राचा समावेश आहे.


14 ऑगस्ट रोजी ‘कॅच द रेन’ विषयावर स्पर्धा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पाण्याचे महत्त्व आणि पावसाचे पाणी संकलन याबाबत जनजागृती करण्यासाठी देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘कॅच द रेन’ अभियानांतर्गत 14 ऑगस्ट रोजी वडेपुरी येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय आणि रत्नेश्वरी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.


15 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅली – स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी, 15 ऑगस्ट रोजी सकाळी जिल्हा परिषद हायस्कूल आणि माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीद्वारे देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. यानंतर हनुमान मंदिर सभागृहात मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये स्वर संगम सेवाभावी संस्थेच्या कलाकारांकडून देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम व गीतांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.



शेतकऱ्यांसाठी कृषी मार्गदर्शन व चर्चासत्र – कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख शेतकऱ्यांना कृषी विषयक मार्गदर्शन करणार असून, यानंतर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक व उपयुक्त कृषी तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.
तसेच 14 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद हायस्कूल व माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत आयोजित तिरंगा रॅली, वृक्षारोपण आणि कृषी मार्गदर्शन कार्यक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय संचार ब्यूरो, नांदेडचे प्रसिद्धी प्रमुख सुमित दोडल, ग्रामपंचायत अधिकारी गजानन शिंदे, रत्नेश्वरी विद्यालयाचे मुख्याध्यापक रत्नाकर फुलारी आणि जि.प. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अंजली कापसे यांनी केले आहे.

