Qureshi community : कुरेशी समाजाच्या गोवंश खरेदी बंद आंदोलनामुळे पशुपालक “आर्थिक संकटात

लोहा| गोवंश हत्याबंदी कायद्याच्या नावाखाली स्वयं घोषित गोरक्षकांनी धुडगुस घातला आहे. त्याला कंटाळून कुरेशी समाजाच्या व्यावसायिकांनी जनावरांची खरेदी विक्री बंद केली असून, टप्प्याटप्प्याने कतलीवर बहिष्कार घातला जात आहे. त्याचा फटका जनावरांच्या बाजारावर झाला मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या लोह्यातील बैल बाजाराच्या दिवशी होणारी कोटी -दीड रुपयांची उलढाल थांबली असून, पशुपालक आर्थिक अडचणीत सापडला आहे. भेकड जनावर विक्री , वाहतूक चामड्याचे व्यवहार थांबले. तसेच जनावराच्या बाजारावर अवलंबून असलेले अन्य व्यवसाय ठप्प झाले आहेत.येत्या काळात चिकन व बकरा मटण विक्री थांबविण्याचा निर्णय हा समाज घेऊ शकतो (?) अशी चर्चा आता सुरू असून, पशुपालक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.


मराठवाड्यात हळी हडरगुळी ,लोहा हे जनावराचे प्रसिद्ध बाजार आहेत. लोहयात मंगळवारी जनावरांचा बाजार भरतो. बैल, गाई, म्हैस, शेळी ,मेंढी यांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते. व्यापारी विशेषतः कुरेशी समाजाचे बेपारी मराठवाड्यात वेगवेगळ्या भागातून खरेदी साठी मोठ्या संख्येने लोह्याच्या बैल बाजारात येतात. छत्रपती संभाजी नगर, जालना घनसंगावी,परभणी,लातूर, बीड ,तसेच जिल्हयांच्या वेगवेगळ्या भागातून जनावरे विक्री साठी येतात बैल बाजारात सिझन काळात सहाशे साडे सहाशेच्या जवळपास दाखले जातात. पावसाळ्यात तीनशे चारशे जनावरांची खरेदी विक्री होते..किमान कोटी -सव्वा कोटी रुपयांची उलाढाल होत असते. पण गोवंशीय जनावराची खरेदी व वाहतूक करताना कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांना फार त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांनी खरेदीवर सामूहिक बहिष्कार टाकला. त्यामुळे तीन बाजार झाले जनावराचे पन्नास सुद्धा दाखले फाटले नाहीत यावरून कुरेशी बांधवांचा निर्णयाचा फटका पशु बाजाराला बसला.

स्वयंघोषित गोरक्षकांचा या व्यापाऱ्यांना फार त्रास असतो काही संघटनांचे कार्यकर्ते, स्वयंघोषित गोरक्षक, गोसेवक बनून जनावरांच्या व्यापाऱ्यांची वाहने अडवितात. वेळप्रसंगी पैशासाठी कुरेशी व्यापाऱ्यांना दमदाटी, मारहाण, इजा केली जाते. टेम्पो, आयचर या वाहनावर पोलीस कार्यवाही केली जाते. व्हिडीओ करून सोशल मीडियावर व्हायरस केला जातो. कथित गोरक्षक, काही गोशाळा मालक आणि काही भागात ( लोहा नव्हे) पोलिसांच्या संगनमताने हा सगळा प्रकार सुरू आहे. अशी ओरड या व्यापाऱ्यांची असते. मागील काही वर्षात जनावरांची वाहतूक करणारी वाहने, “ड्रायव्हर, व्यापारी यांच्यावर पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल केलेत. त्याचा अतिरेकी झाला आणि या समाजाने जनावरे खरेदीवर बहिष्कार टाकला.


जनावरे विकून गरज भागविली जाते
भाकड, गायी, डंगऱ्या बैलांना बाजार दाखवून आलेल्या पैशात भर घालून शेतकरी कामाचे बैल विकत घेतो. घरात काही कमी पडले, कर्ज झाले, लग्न, घर बांधणे आजार, शिक्षण असा कितीतरी गरजा भागविण्यासाठी खुंट्याचे जनावर विकून शेतकरी आपली गरज भगवितात. नव्या पशु कायद्यामुळे ही पद्धत मोडीत निघाली. डंगरे बैल, भाकड गायी, आजारी, पाय मोडलेले, दूध न देणारे, मारके, बसके जनावरे कशी सांभाळायची? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. गोवंश हत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर व्यवहारी, चाणाक्ष शेतकऱ्यांनी जनावरे विकून टाकली; पण आता ज्यांच्याकडे जनावरे आहेत ते पशुपालक चिंतेत आहेत.

अनेकांचे व्यववसाय बंद पडले
गोवंशीय जनावरांची खरेदी विक्री कुरेशी समाजाने थांबविली त्याचा फटका या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना बसला,बाजराच्या दिवशी हॉटेल लावणारे वाहतूक करणारे गाडी मालक अडचणीत सापडले. जनावरांची कत्तल होईनशी झाली त्यामुळे बिर्याणी हॉटेल बंद पडली. त्यावरील धंदे बंद झाले. चामडे विक्री ठप्प झाली जनावरांच्या दाखल्याचे टेंडर घेणारे ,धक्का घेणारे आर्थिक संकटात सापडले. असा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.श्रावण मास सुरू आहे म्हणून त्याचा फार परिणाम मूर्त स्वरूपात समोर आला नाही पण हा महिना संपला की याची तीव्रता उजागर होणार आहे.
बकरा मटण-चिकन बंद होणार (?)
राज्य सरकार च्या गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे कुरेशी समाजाने गोवंश जनावरे खरेदीवर बहिष्कार टाकला .त्याच्या समूहाने खरेदी केले तर २५ हजार रुपयांचा भुर्दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे खरेदीदार पुढे येत नाहीत हा निर्णय आर्थिक कोंडी करणारा असून, पशुपालक अडचणीत सापडला आहे.गोमांस बंद झाले. त्याचे सेवन करणारे त्रस्त झाले आहेत. तर दुसरीकडे येत्या काही दिवसात बकरा मटण व चिकण मटण विक्ती बंद होणार की काय (?) अशी चर्चा सुरू आहे.



