हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| तालुक्यात शेतकऱ्यांच्या मोटारींच्या केबल चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, आता चोरट्यांनी पैनगंगा नदीकाठावरील शिवार गाठले आहे. सेलोडा परिसरात एकाच रात्री तब्बल २० शेतकऱ्यांच्या मोटारींच्या केबल कापून अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही चोरी झाल्याचा अंदाज असून, पैनगंगा नदीकाठावर ऊस, गहू, हरभरा, मका व कांदा पिकांसाठी पाणी देण्याची लगबग सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या मोटारी ठप्प झाल्या. सकाळी शेतावर गेलेल्या शेतकऱ्यांना मोटारी सुरू होत नसल्याचे लक्षात आले. पाहणी केली असता केबल कापून नेल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

यापूर्वी कारला, सवना आणि सेलोडा या गावांमध्येही केबल चोरीच्या घटना घडल्या होत्या. मात्र अद्याप कोणत्याही प्रकरणात ठोस कारवाई झालेली नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढल्याची भावना व्यक्त होत आहे. पोलिसांकडून प्रभावी गस्त व कारवाईचा अभाव असल्याची नाराजी शेतकऱ्यांमध्ये आहे.


ऐन पिकांच्या हंगामात मोटारी बंद पडल्याने पाणीपुरवठा खंडित झाला असून पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.


केबल चोरट्यांना आळा घालावा – राजू पाटील शेलोडकर
शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू पाटील सेलोडकर यांनी सांगितले की, तालुक्यात केबल चोरीचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या मोटारी बंद पडत असून आर्थिक फटका बसत आहे. या संदर्भात आ. बाबुराव कदम कोहळीकर यांनाही माहिती देण्यात आली असून पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

