नांदेड /नायगाव | नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील रातोळी गावातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

चोरट्यांनी मंदिरातील देवाच्या चांदीच्या दागिन्यांमध्ये सुमारे ६५ तोळ्यांचा एक मुकुट, ३३ तोळ्यांचा दुसरा मुकुट, तसेच ३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि कपाटातील अंदाजे ३० हजार रुपयांची रोकड लंपास केली. पहाटे मंदिर उघडण्यासाठी आलेल्या पुजाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तातडीने पोलिसांना कळविण्यात आले.

श्वान ‘कोको’चा चोख तपास
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. श्वान ‘कोको’ हिला कपाटाची चावी व ड्रॉवरचा वास देण्यात आला. त्यानंतर तिने मंदिर परिसरातून वास घेत थेट पूर्वेकडे सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माहेगाव–कार्ला रोडपर्यंत धाव घेतली. त्या ठिकाणी ती गोल फिरून सतत भुंकू लागली.


यावरून चोरटे त्या ठिकाणाहून वाहनाच्या सहाय्याने पसार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या तपासादरम्यान श्वान पथक प्रमुख महमद आयुब सर, पोहेका दत्ता गायकवाड तसेच बीट जमादार बालाजी शिंदे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


‘कोको’ने मंदिरातच केला नमस्कार
विशेष म्हणजे, मंदिरात प्रवेश करताच श्वान ‘कोको’ हिने भगवान विठ्ठल-रुक्मिणी यांना नमस्कार केल्याचा प्रसंग उपस्थित ग्रामस्थांनी भावुक होऊन पाहिला. या घटनेची गावभर चर्चा रंगली असून ‘कोको’च्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिसांचा तपास वेगात
घटनेनंतर पोलिसांनी विविध पथके तयार करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, वाहनांची हालचाल व संशयितांवर लक्ष केंद्रित केले आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
धार्मिक स्थळात झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, मंदिर परिसरात कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

