हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहराच्या राजकीय पार्श्वभूमीवर मोठा राजकीय बदल घडलेला दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही राजकीय पक्षांचे नेते केवळ निवडणुकीच्या काळात अल्पसंख्याक समाजाचा वापर ‘वोट बँके’ सारखा करीत होते. मात्र सत्ता मिळाल्यानंतर त्यांच्याकडे व सार्वजनिक समस्यांकडे दुर्लक्ष केले जात होते. शहरातील काही विशेष प्रभागांमध्ये नागरी सुविधा, विकासकामे आणि प्रशासनाकडून होणारी उपेक्षा, तसेच राजकीय पक्षांच्या नेत्यांचा दुटप्पी भूमिका या सर्व प्रकारांमुळे कंटाळलेल्या मुस्लिम समाजातील काही प्रमुख नागरिकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

हा पक्षप्रवेश भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली, भाजप तालुका अध्यक्ष बाळा पाटील यांच्या उपस्थितीत व प्रयत्नाने शहरातील आझाद चौक येथील पटेल कॉम्प्लेक्समध्ये संपन्न झाला. नवप्रवेशित नागरिकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्ही वर्षानुवर्षे एका विशिष्ट पक्षासाठी मतदान केले. मात्र निवडणुका संपल्यावर आमचा वापर फक्त ‘वोट बँक’ म्हणून केला गेला. आम्हाला फक्त आश्वासने आणि उपेक्षा याच मिळाल्या. त्यामुळेच आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.”या घडामोडीमुळे हदगावच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी झाली असून आगामी काळात या प्रवेशाचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.

या पक्षप्रवेशाच्या वेळी काही नागरिकांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर विश्वास असल्याचेही सांगितले. तसेच शहराच्या विशिष्ट प्रभागांमध्ये नागरी विकासाच्या अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केल्या. परंतु त्याचबरोबर भाजपच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नव्या बदलाची सुरुवात करण्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.



