हिमायतनगर, अनिल मादसवार |तालुक्यातील मौजे कामारवाडी ग्रामपंचायतीत १५व्या वित्त आयोगाच्या सुमारे २ लाख ६५ हजार रुपयांच्या निधीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात सर्व पुराव्यानिशी तक्रार दाखल करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

तक्रारीनंतर हिमायतनगर पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी पी. एम. जाधव (P. M. Jadhav ) व विस्तार अधिकारी प्रमोद टारपे (pramod Tarpe) हे चौकशीसाठी कामारवाडी येथे दाखल झाले. मात्र, चौकशी वरवरची (थातूरमातूर) करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे .

चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी जाब विचारत संताप व्यक्त केला. सर्व कागदपत्रांसह तक्रार करूनही मागील सहा महिन्यांपासून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला.


या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


