हदगाव, शेख चांदपाशा| गेल्या दहा वर्षांत राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांतून कोट्यवधी रुपयांचा निधी हदगाव नगरपरिषदेला प्राप्त होऊनही शहराच्या आर्थिक स्थितीची अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नगरपरिषदेची वार्षिक कर वसुली अवघी ३६ लाख रुपये इतकी असून, पाणीपुरवठ्यासाठी महावितरणची तब्बल ७५ लाख रुपयांची वीज थकबाकी प्रलंबित आहे. याशिवाय उपविभागीय कार्यालयाकडे ३० लाख रुपये इमारत भाडे थकीत असल्याचेही उघड झाले आहे.

विशेष म्हणजे १९९२ पासून शहरात नवीन करप्रणालीच लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे महसूल वाढीचे कोणतेही ठोस नियोजन न करता नगरपरिषद चालवली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. शासनाकडून आलेला विकास निधी नेमका कुठे खर्च झाला, शहराचा प्रत्यक्ष विकास कुठे दिसतो, की फक्त कागदोपत्रीच कामे दाखवली गेली—असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नगरपरिषदेच्या या ढासळलेल्या आर्थिक कारभाराचा पहिल्यांदाच सखोल आढावा घेताना आमदार बाबुराव कदम कोहळीकर हेही अक्षरशः आवाक झाले. तर नव्याने पदभार स्वीकारलेल्या नगराध्यक्षा रोहिणी वानखेडे यांच्यासमोर आर्थिक व नागरी समस्यांचा प्रचंड डोंगर उभा राहिला आहे.


दरम्यान, हदगाव शहरासाठी जीवनदायी ठरणारी ४७ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना गेल्या चार वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. ७५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात नागरिकांना अद्यापही पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. तांत्रिक अडचणींच्या नावाखाली काम जाणूनबुजून रखडवले जात आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या पार्श्वभूमीवर, मागील सत्ताधाऱ्यांनी शहराच्या नागरी विकासासाठी नेमके काय केले, निधीचा योग्य वापर झाला की नाही, याबाबत संशयाचे ढग दाटले आहेत.

हदगाव नगरपरिषदेच्या नागरी समस्या व भावी विकासाच्या अनुषंगाने आ. कोहळीकर यांनी नगराध्यक्ष, नगरसेवक, नागरिक व स्थानिक पत्रकारांशी संवाद साधत प्रशासनाला सज्जड सूचना दिल्या. पारदर्शकता, आर्थिक शिस्त व जबाबदारीने काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
याचवेळी दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अनन्या रेड्डी यांनी हदगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदाचा पदभार स्वीकारला. यानिमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी नव्या प्रशासनाकडून पारदर्शक व जबाबदार कारभाराची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमास जिल्हा शिवसेना प्रमुख विवेक देशमुख, युवा नेते भास्करदादा वानखेडे, बाबूसराव कदम, नगरसेवक ज्योती राठोड, बालाजीराव शिंदे, गुणवंत काळे, पांडुरंग जाधव, सचिन सूर्यवंशी, साई बाबुलकर, नामदेव वाकोडे, संदीप हुलकणे तसेच स्थानिक पत्रकार, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आता तरी नगरपरिषदेला आर्थिक शिस्त लागणार का? हा प्रश्न उपस्थित होत असून, हदगाव शहरवासीयांच्या नजरा नव्या नगराध्यक्ष, नगरसेवक व प्रशासनाच्या कामगिरीकडे लागल्या आहेत, हे विशेष.

