नांदेड l आम्ही रमाईच्या,आम्ही भिमाईच्या, आम्ही जिजाईच्या, आम्ही सावित्रीबाईंच्या, आम्ही झलकारीच्या, आम्ही दुर्गावतीच्या, आम्ही बिरसाच्या वाघिणी, आम्ही आदिवासी कन्या या सूर्यकांता मिराशे यांच्या रचनेतील गीताला मेळाव्यात प्रचंड दात देत महिलांनी त्यांचे सादरीकरण केले.

आदिवासी समाजाच्या वतीने ३ फेब्रुवारी रोजी शहरातील मालेगाव रोडच्या रेड्डी गार्डनमध्ये आंध आदिवासी समाजाच्या वतीने महिला मेळावा घेण्यात आला. त्यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी बीएसएनएल अधिकारी जयश्रीताई डोखळे तर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रतिभाताई बोथीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या महिला मेळाव्यात हळदी कुंकू, स्नेह मिलन तसेच सांस्कृतिक, मनोरंजनात्मक आणि कलात्मक स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या महिलांना वृक्ष व ग्रंथ भेट देण्यात आले. विविध स्टॉल मधून घरगुती वस्तूंची विक्रीही झाली. मेळाव्याचे सूत्रसंचालन डॉ. जयश्री आढाव व छाया भुरके यांनी केले. प्रास्ताविक सूर्यकांता मिराशे तर आभार वंदना नाईक यांनी मानले. कार्यक्रमास ३५० पेक्षा जास्त आदिवासी महिलांची उपस्थिती होती.



