
बस प्रवासाची तयारी, ग्रुप्स आणि नेतृत्व – उद्या पासून अमरनाथच्या दिशेने बस प्रवास सुरू होणार होता.त्यामुळे दोन ग्रुप तयार केले: प्लॅटिनम ग्रुप – कॅप्टन: दुलाजी सूर्यवंशी , कॅशियर: रविंद्र केंद्रे.ग्रुप मध्ये समावेश होता – सुरेश शर्मा, वसुबेन व जयंतीलाल पटेल, वंदना व दुलाजी सूर्यवंशी, सुनीता व सुनील व्यवहारे, ज्योती व विनायक किन्होळकर, सारिका व रविंद्र केंद्रे, राधा व सुरेश घुगे, सुरेखा व चंद्रशेखर मुंढे,जयमाला लटपटे,सुवर्णा केंद्रे , शिल्पा व शंकर मोरलवार, रेश्मा व महादेव पवार, प्रणिता व प्रकाश कुलकर्णी, माधुरी व प्रवीण कानडखेडकर, अनुराधा व जयंत जोशी, वंदना व सुरेशसिंह सद्दीवाल, मीरा व सुभाष वानोळे, सुप्रिया व सुरेश कुलकर्णी, मिनाक्षी व संग्राम हिंगोले, अरुणा व दिगंबर गिरी, चित्ररेखा व नारायण पांडे, ज्योती व सुधीर शिवणीकर, कल्पना व अजय संगेवार,आशा पल्लेवार,अमरसिंह चौहान.हे नावं केवळ सहप्रवासी नव्हेत – ही ती मंडळी होती जिच्या खांद्यावर श्रद्धेचा विश्वास होता!


From Amarnath Cave – Part 6 (Author – Dharmabhushan Adv. Dilip Thakur) हॉटेल बुर्ज बाहेर आमच्या चंदीगढहून येणाऱ्या दोन एसी बसेस आलेला होत्या.त्या हुजूर साहब ट्रॅव्हल्सच्या, पुश बॅक टू बाय टू, पूर्ण वातानुकूलित, चमचमीत नव्या बस दाखल झाल्या…गेल्या वर्षीच्या अनुभवावरून यंदा एसी बसेसच निवडल्या होत्या – आणि हा निर्णय १००% योग्य ठरला.

बस प्रवासाची संहिता – ‘सीट बदला, मतभेद टाळा’
बसमध्ये पुढच्या किंवा मागच्या सीटवरून नेहमी कुरबुरी होतात.पण माझं एक ठाम धोरण – “दररोज सीट बदला, सर्वांमध्ये न्याय पाळा!” प्रत्येक यात्रेकरूच्या चेहऱ्यावर समाधान असावं, हाच माझा प्रयत्न. आज डायमंड ग्रुपचे नेतृत्व सुभाष देवकते कडे –ते माझ्यासोबत त्यांना वेळा अमरनाथ यात्रा केलेले अनुभवी सहकारी.त्यांना कॅप्टन, आणि दुसऱ्यांदा येणाऱ्या कॅशियर बनवले होते रामेश्वर वाघमारे यांना.या ग्रुपमध्ये होते: राजेशसिंह ठाकूर,ज्योती वाघमारे, सुनीता व संजय कलकोटे, निर्मला व पद्माकर केंद्रे,प्रतीक्षा केंद्रे, सुनीता जैन, गिता व दत्तात्रय पावडे, विजया व दत्ता खानजोडे, छाया व उद्धव केंद्रे, प्रेमला व सुरेश नागरगोजे, सुनीता व सुधाकर केंद्रे, अनिता व बालाजी ढाकणे, रुपाली व शेलेंद्र वडजकर, शार्दूल ,शर्वरी, रेणुका व अच्युत जोशी, कमल व विरभद्र जाधव, माधवी व मनोज जोशी,साईनाथ व शंकर कासटवार,विशाल पवार, कांचन व नरेंद्र जोशी, सपना व राजू सतलावार,साईप्रसाद हळदे ,रमेश जटाळे,माधव बामणे,जयप्रकाश येवले,व्यंकटेश जामकर, विमल व गोदावरी चव्हाण, निखिल चव्हाण.सारी नावे ही केवळ यादी नाही, तर हृदयाने जोडलेले प्रवासी होते.


पहिलं लंगर – ‘प्रेमाची पहिली पंगत’
सकाळी सात ला चेकपोस्टवरून मार्ग मोकळा झाला. काही अंतर गेल्यावर मनिग्राम येथील लंगर वर सर्वांनी नाश्ता कम जेवणावर ताव मारला . लखनौ लंगर मध्ये अत्यंत चविष्ट जेवण मिळालं, गुलाबजामुन, राजमा भाजी, वरणभात, फुलके, दहीभात, जिलेबी! सांगायला हवं – लंगर म्हणजे केवळ अन्न नाही, ती भक्तीची चव असते.मी तिथे अमित त्रिवेदी यांचा सत्कार केला आणि म्हटलं, “ही यात्रा केवळ मिलिट्री, लंगरवाले आणि घोडेवाले यांच्या त्रिकुटामुळे शक्य होते.मिलिट्री – ड्युटी करते,घोडेवाले – सेवा करतात पैशासाठी, पण लंगरवाले – निस्वार्थ सेवा देतात!”हे शब्द ऐकून अमितजींनी सर्वांसाठी कोल्ड ड्रिंक्स मागवले आणि “भोले की बारात निकली,पंखुडा,किती सांगू मी सांगू कोणाला …” या भजनावर सर्वांना नाचवलं! इथे उपस्थित आर्मी हॉस्पिटलमधून अनेकांनी तपासणी आणि औषधे घेतली. हेच ते भावविश्व होतं –”जो देतो, त्याचा मान ठेवावा – आणि जो घेतो, त्याने कृतज्ञ असावं!

खेळ – ‘समोसा कचोरी’ आणि हसण्याची लाट
प्रवासात रंग भरावा म्हणून एक खेळ – “समोसा कचोरी!” विजेत्याला बक्षीस: ₹५०० आणि हरलेल्यासाठी पेनल्टी – गाणं, विनोद किंवा उठाबशा!कोणी चांगलं गाणं म्हणालं, कोणी धमाल विनोद सांगितले –टाळ्यांच्या कडकडाटात बस गगनात भरून निघाली!आणि मी नेहमीप्रमाणे माझ्या धमाल विनोदांनी वातावरण गदगदून टाकलं.
सोनमर्ग :आनंदयात्रा
पुढचा टप्पा होता सोनमर्गचा,कश्मीरचं हे सौंदर्यस्थळ म्हणजे निसर्गाची खोल श्वास घेण्यासारखं. गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम ही त्रयी कोणत्याही यात्रेकरूच्या गाठीशी असायलाच हवी.दरवर्षी सोनमर्ग ला जाण्यासाठी पाच तास लागायचे. पण यावर्षी नव्याने सुरु झालेला सोनमर्ग टनेल मुळे तीनच तास लागले. साडे सहा किमी अंतर चा हा बोगदा म्हणजे मोदी सरकार तर्फे अमरनाथ यात्रेकरूना मिळालेली अमूल्य भेटच. फिश पॉईंटचे निसर्ग सौन्दर्य पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर लहानपणीचा आनंद खुलला.पाण्यावरच्या विविध खेळांची घेतलेली मजा,सेल्फी, विडिओज, आणि ‘रिल्स’ यांचा जल्लोष सुरू झाला.
बालटाल – कडक सुरक्षेच्या साक्षीने प्रवेश
शेवटी आम्ही चार वाजता बालटालला पोहोचलो. हे ठिकाण पूर्वी अतिरेकी हल्ल्याच्या सावटाखाली आलेलं – त्यामुळे मिलिटरीचा कसून बंदोबस्त होता. प्रत्येक यात्रेकरूची तपासणी, मगच आम्हाला बेस कॅम्पमध्ये प्रवेश मिळाला.प्रवेशासाठी आवश्यक असते यात्रा परची आणि त्यावरून RFID कार्ड घेतले जाते.
सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्यामुळे अडथळा आला नाही.बालटालमध्ये राहण्याची सोय तात्पुरत्या टेन्टमध्ये असते.मी दरवर्षी प्रमाणे पूजा टेन्ट हाऊस मध्येच मुक्कामी होतो.प्रत्येक तंबूमध्ये ६ ते १० व्यक्तींची सोय – गादी, रजई, उशी –थंडीपासून सुरक्षेचा योग्य विचार केलेला.उद्या करायचा घोडा व पालखी द्वारे प्रवास हे सर्व आधीच अॅडव्हान्समध्ये भरावे लागते.म्हणूनच रात्रीतूनच सर्वांचे बुकिंग पूर्ण करून घेतले.दिवसभराच्या धावपळीनंतर लंगरात संतोषकारक जेवण केले.सर्वांना स्पष्ट सूचना दिल्या. “उद्याची यात्रा ही नशिबाची परीक्षा आहे, त्यामुळे आज झोप ही श्रद्धेची तयारी आहे. (क्रमश:)



