
वनसंवर्धनाचा संकल्प, निसर्गाशी नातं दृढ करण्याचा दिवस…जागतिक वनदिन हा दरवर्षी २१ मार्च रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने २०१२ साली हा दिवस अधिकृतपणे घोषित केला. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे वनांचे महत्त्व समजावून सांगणे आणि त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे.


जागतिक वनदिन हा केवळ दिनविशेष नसून, मानव आणि निसर्ग यांच्यातील अतूट नात्याची जाणीव करून देणारा महत्त्वाचा दिवस आहे. जंगल हे पृथ्वीचे श्वास आहेत—ते आपल्याला प्राणवायू देतात, जलस्रोत जपतात, हवामान संतुलित ठेवतात आणि असंख्य जीवसृष्टीचे आश्रयस्थान आहेत.

आजच्या वेगाने बदलणाऱ्या युगात जंगलांचे संवर्धन आणि संरक्षण ही काळाची गरज बनली आहे. शासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत—वृक्षलागवड मोहिमा, वन्यजीव संरक्षण कायदे, अभयारण्य व राष्ट्रीय उद्याने घोषित करणे, तसेच जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न होत आहे.



जंगलाशी जुळलेलं आयुष्य
वन्यजीव छायाचित्रकार म्हणून कार्य करताना मागील चार दशकांहून अधिक काळ महाराष्ट्रातील विविध जंगलांमध्ये भटकंती करताना मला अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभले—ही माझ्यासाठी अमूल्य संपत्तीच ठरली. त्यांच्या सान्निध्यातून मला वन, वन्यजीव, पक्षी आणि निसर्ग यांच्याबद्दल केवळ माहितीच नव्हे, तर एक जिवंत जाणिव मिळाली.


आज ते आपल्या सोबत नसले तरी, प्रत्येक वनदिवशी त्यांची आठवण मनात दाटून येते. माझ्या संग्रहातील जुनी छायाचित्रे चाळताना प्रत्येक फ्रेम त्या त्या जंगलातील आठवणी पुन्हा जिवंत करते. छायाचित्रणाच्या माध्यमातुन पादाक्रांत केलेली वन जंगले त्यात मेळघाट, ताडोबा, चिखलदरा, कोलखास, कोकटु ,नवेगाव, नागझीरा, अंधारबन, पेंच, नानज-रेहकुरी , मध्यप्रदेशील कान्हा केसली ,आणि छत्तीसगडमधील बस्तर—तसेच नांदेड जिल्ह्यातील किनवट माहुर मांडवी ईस्लापुर या व अन्य अरण्यभ्रमंतींनी माझ्या आयुष्याला समृद्ध केले.

त्या प्रवासात राणयात्री मारुती चितमपल्ली नवेगाव बांध चे माधवराव पाटील ,माजी संचालक प्रल्हाद जाधव, ऊपसंचालक शरद चौधरी,बोरीवली नॅशनल पार्कचे माजी उपवनरक्षक श्री भारती जिल्हा माहिती अधिकारी श्री अनिल गडेकर विविध ठिकाण चे वनाधिकारी वनसंरक्षक गार्ड यांचे मार्गदर्शन लाभले. यांच्या सान्निध्य सहवासात वन, पशुपक्षी ,वन्यजीव
आणि वृक्षसंपदेचे छायाचित्रण करताना अनेक अनमोल क्षण टिपता आले.

आदिवासी बांधवांसोबत जंगलात घालवलेले क्षण तर आयुष्यभर जपून ठेवावा असा खजिना आहे—निसर्गाशी एकरूप झालेलं त्यांचं जीवन आपल्याला खूप काही शिकवून जातं. छायाचित्र म्हणजे काळाचा शांत ठसा काळ सरतो… वातावरण बदलते… माणसंही बदलतात… पण छायाचित्रं मात्र त्या क्षणांना पुन्हा जिवंत करतात.
छायाचित्र म्हणजे वेळेचा शांत ठसा, क्षणांच्या ओंजळीत साठलेली एक श्वासभर कहाणी. आज वनदिवसाच्या निमित्ताने या साऱ्या आठवणी पुन्हा मनात दाटून येतात आणि एकच संदेश देतात— वन जपलं तरच भविष्यातील जीवन सुरक्षित राहील
चला आपण ही संकल्प करुया.

प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावावा आणि त्याचे संगोपन कराव जंगल आणि वन्यजीवांचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी मानावीनिसर्गाशी सुसंवाद ठेवूनच विकासाचा मार्ग निवडावा…“वन वाचवा… जीवन वाचवा!”
विजय होकर्णे, वन्यजीव छायाचित्रकार



