हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहर व परिसरामध्ये राज्य व राष्ट्रीय महामार्गाचे नव्याने झालेले काम पाहता नागरिकांना वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात या महामार्गांवर वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. यावर प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस उपाय न झाल्याने नुकतेच नवीन पदभार झालेले पोलीस निरीक्षक संकेत दिघे व नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडून ठोस कारवाईची अपेक्षा नागरिक करत आहेत.


शहरात निजामकालीन मुख्य प्रवेश मार्ग केवळ एकच असून, या मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूस सरकारी पादचारी मार्ग आहे जो अंबाळा गावाच्या हद्दीपर्यंत जातो. मात्र हा मार्ग काही प्रभावशाली लोकांनी बळकावलेला आहे. या गंभीर समस्येकडे कोणत्याही लोकप्रतिनिधी कडून लक्ष दिले गेलेले नाही. त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधी ही समस्या जाणीवपूर्वक दुर्लक्षित करत असल्याचे चित्र आहे.


सध्या “प्रशासकीय राज” सुरू असून, अधिकारी फक्त आमदार व खासदारांच्या सूचनांपुरतेच मर्यादित आहेत अशी परिस्थिती आहे. कुणी या विषयावर प्रश्न विचारणार नाही असा संताप जागरूक नागरिकांमध्ये दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी ही असे प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याने प्रशासनही निष्क्रिय राहते आहे. सध्या जनतेचे लोकप्रतिनिधी यांना जनतेच्या अडचणी ऐकायला वेळ नाही. मग सामान्य नागरिकांनी व्यथा कुणाकडे मांडायची असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

हदगाव शहर व तालुक्यात राज्य व राष्ट्रीय महामार्गांचे जाळे पसरले आहे, ज्यामुळे रस्ते विस्तारले आहेत. मात्र, वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे कोणतेही ठोस उपाय अजूनही नसल्याचे स्पष्टपणे दिसते. नव्या रस्त्यांच्या कडेला वाहनचालक, ऑटो, टॅक्सी, ट्रॅव्हल्स व खाजगी वाहने ठराविक जागा नसल्यामुळे मनमानीपणे उभी केली जातात. नगर परिषद व पोलीस प्रशासन यांच्याकडून यासाठी कोणतीही ठराविक पॉईंट न दिल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

कधी तरी माध्यमांतून बातमी प्रसिद्ध झाली तरच प्रशासन हलते आणि काही ठिकाणी थोडीफार कारवाई केली जाते. अधिक विचारणा केल्यास पोलीस दलाची संख्या कमी असल्याचे कारण सांगितली जातात. वरिष्ठ अधिकारी केवळ दौऱ्याच्या निमित्ताने येथे येतात आणि वाहतुकीच्या गडबडीतून परत जातात ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले असून, कधी कधी तर, आपत्कालीन परिस्थितीत नांदेडकडे रुग्णवाहिका घेऊन जाणेही कठीण बनते.
स्थानिक प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते आहे. दरवर्षी प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहतूक जनजागृती कार्यक्रम मोठ्या प्रचारासह कायक्रम आयोजित केले जातात, मात्र ते केवळ कागदापुरते मर्यादित राहतात. नागरिक, युवक व पालकांशी थेट संवाद न घडवणे व स्थानिक माध्यमांपासून अंतर ठेवणे हेही चिंतेचे विषय आहेत.
हदगाव पोलीस स्टेशनला नवीन फौजदार…!
काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी हदगाव पोलीस स्टेशनच कार्यभार स्वीकारला आहे. त्यांनी हदगाव परिसरातील काही घटनांचा सखोल अभ्यास केला असून, अनेक घटना किरकोळ कारणांमुळे घडल्याचे त्याच्या लक्षात आले आहे अस त्याच्याशीचर्चा करतांना दिसून आले.