बिलोली (गोविंद मुंडकर ) बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे शनिवार दि. ४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.


या अवकाळी पावसासोबत मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने गावात मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी ग्रामस्थ यांच्या घरांवरील पत्रे उडून गेली असून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तसेच काही भागात विजेचे पोल झुकल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.

या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतातील पिके तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत माहिती देताना देविदास कोंडवाडे यांनी सांगितले की, या अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्या समोर मोठे संकट उभे ठाकले आहे. आधीच विविध अडचणींना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांवर हा आणखी एक मोठा आघात ठरला आहे.


दरम्यान, सगरोळी येथील सामाजिक कार्यकर्ते देविदास कोंडलाडे यांनी प्रशासनाने या घटनेकडे तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. बिलोलीचे तहसीलदार श्री. गजानन शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी करून त्वरित पंचनामे करावेत तसेच बाधित शेतकरी आणि घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने तातडीने मदत व नुकसानभरपाई जाहीर करून बाधितांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रशासनाकडून लवकरात लवकर मदतीची कार्यवाही होईल, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.



