
हिमायतनगर,अनिल मादसवार| कलियुगात संसाररूपी मायेच्या विषामुळे मनुष्य जीवन जखडलं गेलं आहे. हे विषारी वलय बाहेर काढून फेकायचं असेल आणि मानसिक समाधान मिळवायचं असले तर “ओम नमः शिवाय” नामाचा अथवा तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका भगवंताच्या नामाचा जाप करणे हा एकमेव उपाय आहे. यासाठी प्रत्येक मनुष्याने नित्यनेमाने नामजप केला तर मनुष्य जीवन अमृतमय होऊन जाते. असे अमृतमय विचाराचा संदेश श्री शिव सद्गुरू शिवलिंग स्वामी दत्त संस्थांन पिंपळगावचे मठाधिपती प. पु. बालयोगी व्यंकटेश महाराज यांनी उपस्थित भाविक भक्तांना दिला.



हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात प. पु. बालयोगी व्यंकटेश महाराज यांच्या सूचनेवरून पवित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासून “ओम नमः शिवाय” नामजप यज्ञाला सुरुवात झाली आहे. यज्ञाच्या सोळाव्या दिवशी म्हणजे दिनांक २० ऑगस्ट रोजी दुपारी अचानक स्वामीजींनी भेट दिल्यानंतर उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी संत ज्ञानेश्वरी भाव कथेचे प्रवक्ते हभप. अर्जुन महाराज खाडे, श्री परमेश्वर मंदिर देवस्थानचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सचिव अनंतराव देवकते, डॉ.राजेंद्र वानखेडे मारोतराव लुम्दे पाटील यांच्यासह अनेक महिला पुरुष भाविकांची उपस्थिती होती. “ओम् नमः शिवाय” नामजप यज्ञामध्ये सकाळी चार ते सहा वाजेपर्यंत योगा परीवाराचे नागनाथ आक्कलवाड, डॉ. राजेद्र वानखेडे, सुभाष बलपेलवाड, साहेबराव अष्टकर, विलास वानखेडे यांच्यासह योगा परीवाराचे सदस्य नित्यनेमाने यज्ञात सहभागी होत असल्याबद्दल आणि विशेषतः मध्यरात्री काही युवा मंडळी या यज्ञात सहभागी होत असल्याबद्दल त्यांचे बालयोगी व्यंकट स्वामी महाराजांनी कौतुक करू उपस्थित सर्वाना आशिर्वाद दिले.


यावेळी पुढे उपदेश करताना स्वामीजी म्हणाले कि, पहिल्या काळात केवळ “ओम नमः शिवाय” या मंत्राने सर्पदंश झालेल्या व्यक्तीचे विष उतरले जात होते. मात्र आत्तातरी मनुष्यामध्ये विविध विकाराचे साप दडलेले आहेत. ते साप बाहेर काढण्यासाठी… जन्मो जन्मीचे विषारी वलय.. बाहेर काढण्यासाठी स्वत्विक आहार, मन, चित्त शुद्ध असणे आवश्यक आहे. प्रतयेक धार्मिक कथा ऐकताना भाव ठेऊन ऐका… मंदिर ट्रस्टच्या सदस्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिल आहे. त्यामुळे नामजाप यज्ञाला अनेकजण बसत आहेत, नामजप केल्याने मनातील वाईट विकार दूर होऊन चित्त शुद्द होते. मानसिक समाधान मिळते… मंदिरात घंटी लावण्याचा उद्धेश म्हणजे मंदिरात आलेल्या माणसाच्या मनात बाहेरील विचार येऊ नयेत म्हणून घंटा हि जागृत ठेवण्यासाठी लावण्यात आलेली आहे. घंटा वाजविल्याने त्यातून निघणारा ध्वनी देखील जीवनात सुख – समाधान देऊन जाते.



सात्विकतेने पुजन आणि दर्शन करुन मंदिराच्या भोवताली प्रदक्षिणा करणे याला देखील एक महत्व आहे. पूर्वीचे सत्पुरुष विषारी सापाचे विष मंत्रातून उत्तरावीत होते. पूर्वज गुरुकुल प्रमाणे सर्वजण एकत्र बसून ज्ञानाचे संस्कार देऊन नामजप करत होते. त्यामुळे कुटुंबात एकोपा व चांगले विचार नांदत होते. तिचे दिवस पुन्हा यावे आणि सर्वांच्या जीवनात मानसिक समाधान टिकून राहावे. म्हणून धर्म जागृत ठेवण्याचे काम कीर्तन, भजन, प्रवचनातून केले जाते आहे. ज्या ठिकाणी कीर्तन भजन आयोजित केले जाते त्या ठिकाणी सर्वानी उपस्थित होऊन संतांचे विचार ऐकायला हवे. संतांचे विचार ऐकल्यानंतर ईश्वराच नामस्मरण केल्याने मनुष्य जीवनात बदल घडून येतो. श्री परमेश्वर मंदिरात सुरु असलेल्या “ओम् नमः शिवाय” नामजप यज्ञ यज्ञाचा मंगळवार दिनांक ०३ सप्टेंम्बर रोजी सकाळी नऊ वाजता कलश पूजन श्री परमेश्वराचा महाभिषेकाने होईल सर्वानी वेळेवर उपस्थित राहून यज्ञाची यशस्वी सांगता करावी असे आवाहनही बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी उपस्थितांना केले. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला मंडळी, पुरुष मंडळी व युवा मंडळींनी उपस्थिती लावली होती.




