Apparaopeth flood: आप्पारावपेठच्या नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने पाच वर्षाचा लहान बालकाचा मृत्यू

शिवणी/किनवट,प्रतिनिधी| किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील असलेल्या मौजे अप्पारावपेठ येथे गुरुवारी दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील विविध नाल्याला पूर आला. दरम्यान शेताकडून बैलगाडीवर घराकडे येताना पुराच्या पाण्याच्या प्रवाहात बैलगाडी उलटून पाच वर्षाचा अभिनव हा लहान बालक पुराच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर यातून बैलगाडीत अन्य लोक दैव बलवत्तर म्हणून बाहेर पडले आहेत.


किनवट तालुक्यासह शिवणी इस्लापूर परिसरात मागील काही दिवसापासून सतत पाऊस चालू आहे. दिनांक १२ जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मोठा पाऊस झाला. या पावसामुळे अप्पारावपेठ येथील शेतकरी गजराम गुमुल व त्यांची सून अर्चना गजेंद्र गुमुल आणि पाच वर्षाचा नातू अभिनय गजेंद्र गुमुल सह इतर दोन महिला बैलगाडीवर घराकडे येत असताना गावाजवळील नाल्यातून नाला पार करत असताना अचानक आलेल्या पुरात बैलगाडी उलटली. यात बैलजोडीने हिसका मारून बाजूला गेल्यावर इतर सर्व कसेबसे बचावले. पण या घटनेत पाच वर्षाचा बालक अभिनव गजेंद्र गुमुल वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

सदरील घटना ही अप्पारावपेठ गावात वाऱ्यासारखी पसरली यावेळी गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात धाव घेत सदरील बालकाचा नाल्यात शोध घेतला असता तब्बल दोन तासानंतर त्या बालकाचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती इस्लापूर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी उमेश भोसले यांना कळविताच पोलिस उपनिरीक्षक अतुल डाके सह बीट अंमलदार पठाण व पोलिस कर्मचारी यांनी घटना स्थळी धाव घेऊन पाहणी केली. या घटनेची माहिती किनवट तहसीलदार सौ. शारदा चौंढेकर यांना कळविण्यात आले असून, वृत्त लिहेपर्यंत महसूल व पोलिस प्रशासनाची कारवाई चालू होती. शिवणी परिसरातील मौजे अप्पारावपेठ येथे आज दुपारी पावसाच्या पुराच्या पाण्यात वाहून पाच वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला या दुर्देवी घटनेमुळे अप्पारावपेठ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे





