उस्माननगर, माणिक भिसे| स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात व देशात मोठ्या प्रमाणात, उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर मागील तीन वर्षांपासून राज्यात घरोघरी तिरंगा हे अभियान राबविण्यात येत असून सदरील अभियान यावर्षी सुध्दा राबविण्यात येत असल्याने दि १२ ऑगस्ट मंगळवारी सकाळी उस्माननगर येथील चारही शाळेतील विद्यार्थी, सहशिक्षक व काकांडी येथील युवा ॲकडमी यांनी तिरंगा रॅलीत सहभागी व्होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या दरम्यान उशिरा आलेल्यांनी रॅलीत उभे राहून फोटो काढण्यासाठी लगबग दिसून आली.


महाराष्ट्र शासनाच्या निदर्शना नुसार हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या आभियाना अंतर्गत उस्माननगर येथील चार शाळा व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने दि.१२ ऑगस्ट रोजी सकाळी दत्त मंदिर, समता विद्यालय , झेंडा चौक ते गावातील प्रमुख मार्गाने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मुलांची व मुलींची, सम्राट अशोक प्राथमिक शाळा , समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय , महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी , सहशिक्षक , गावातील नागरिक , कांकाडी येथील युवा मिलिटरी ॲकडमी यांनी सहभाग घेतला.


सम्राट अशोक प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा या शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेक्षीमच्या तालावर भक्ती गीतांवर सादरीकरण करुन देशभक्ती व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. समता माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हातात फलक घेतले होते. यावेळी भारत माता की जय….. ! तिरंगा झेंड्याचा विजय असो…. अशा अनेक घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मात्र एकीकडे विद्यार्थी घोषणा देत होते. तर हौशी देशभक्त फोटो काढताना दिसत असल्याने नागरिक कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत होते. सकाळी निघालेल्या तिरंगा रॅलीचा समारोप समता माध्यमिक विद्यालय येथे करण्यात आले. या तिरंगा रॅलीत शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे, सौ वांगे, खांन, मुख्याध्यापक सोनवणे, मुख्याध्यापक शिवसांब कोरे , भगवान जाधव , यांच्या सह अनेक देशभक्त उपस्थित होते.




