मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील दुर्घटनेत गावकऱ्यांचे मोठे हाल झाले असताना शासन प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे १२ जणांचा बळी गेला. शेकडो जनावरे दगावली, शेतपिके व घरे वाहून गेली, शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. तरीसुद्धा महाराष्ट्र शासन व स्थानिक आमदार गप्प बसले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने थेट तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याकडे धाव घेत तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी केली आहे.


हैदराबाद येथे नांदेडचे खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी शिवसेनेचे पाटील यांनी सांगितले की, लेंडी प्रकल्पातील ६० टक्के पाणी तेलंगणाचा वाटा असल्याने या आपत्तीत बाधित कुटुंबांना, शेतकऱ्यांना, मजुरांना व गोरगरीबांना तेलंगणा सरकारकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर व्हावी.

प्रशासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता बळजबरीने पोलिस बंदोबस्तात धरणाच्या गळभरणीचे काम करून गेट बंद केले, त्यामुळे मध्यरात्री गावात पाणी शिरले आणि ही दुर्घटना घडली. ही नैसर्गिक आपत्ती नसून प्रशासनाने घडवून आणलेली मानवनिर्मित आपत्ती आहे, असा ठाम आरोप बुडीत क्षेत्रातील नागरिकांसह शिवसेनेने केला आहे.


दुर्घटनेनंतर तातडीचा उपाय म्हणून प्रशासनाने टीनशेडच्या निवाऱ्याची सोय केली असली, तरी तो निवारा निकृष्ट दर्जाचा असून साध्या प्राथमिक गरजासुद्धा तिथे उपलब्ध नाहीत. वीज, पाण्याची व्यवस्था नाही; शिवाय टीनशेड्स वापराआधीच गळायला लागले आहेत. या संपूर्ण कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप सुद्धा ग्रामस्थ आणि शिवसेनेने केला आहे.

निवेदन सादरीकरणावेळी नांदेडचे खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण, श्रीनिवास चव्हाण, उपजिल्हाप्रमुख महेश पाटील देगलूर, शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर, मुखेडचे तालुका प्रमुख उमेश पाटील आडलूरकर,देगलूर शिवसेना प्रवक्ता सरपंच बालाजी चोपडे खुतमापुरकर, मुखेड शिवसेना उपतालुकाप्रमुख अनिल पाटील राजुरकर, राहुल ठाकुर आदी उपस्थित होते.
या निवेदनाच्या प्रती माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नांदेडचे खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हा प्रमुख बबनराव बारसे, उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. दरम्यान
प्रशासनाच्या बेफिकिरीवर संताप व्यक्त करत, “ही सामान्य जनतेला भेडसावणारी मानवनिर्मित आपत्ती असून बाधितांना न्याय मिळाल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही”, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.

