
नांदेड| शिर्डी हे लाखो साईभक्तांचे श्रद्धेय स्थान असून, साईबाबांच्या निस्सीम भक्तीमुळे ते पंढरपूर प्रमाणेच पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केले. नानक साई फाऊंडेशनतर्फे शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य साई भक्त संमेलनात त्या बोलत होत्या.


या संमेलनाचे उद्घाटन साईबाबा शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तृप्ती देसाई यांच्यासह विविध मान्यवरांना ‘नानक साई अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना देसाई यांनी सांगितले की, साईबाबांवरील अपार श्रद्धेमुळे देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत दर्शनासाठी येतात. येथे भक्तांना केवळ धार्मिक समाधानच नव्हे, तर मानसिक शांतताही लाभते.


साईबाबा शिर्डी संस्थानमार्फत भाविकांच्या कल्याणासाठी सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात मोठे कार्य केले जात असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले. भाविकांसाठी सर्व सुविधा प्रामाणिकपणे उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले.


नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे यांनी साईबाबांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, १९व्या शतकात साईबाबांनी शिर्डीत वास्तव्य करून “श्रद्धा आणि सबुरी” हा संदेश दिला तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श घालून दिला.
या भव्य साई भक्त संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘नानक साई अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास शिर्डीच्या नगराध्यक्षा सौ. जयश्री थोरात, विविध क्षेत्रातील मान्यवर व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.




