हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली असून, रेबीज प्रतिबंधक लसीचा गंभीर तुटवडा असल्याने नागरिक भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत. शहरातील रस्ते, बाजारपेठा, शाळा परिसर तसेच गल्लीबोळात खरजेने बाधित व विविध आजारांनी ग्रस्त कुत्रे मुक्तपणे फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांत शहरात आठ ते दहा नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, उपचारासाठी हिमायतनगर ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलेल्या नागरिकांना रेबीजची लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. परिणामी, अनेक गोरगरीब नागरिकांना खासगी रुग्णालयांतून पाच ते सात हजार रुपये खर्च करून लस खरेदी करावी लागत आहे.

हिमायतनगर शहरासह तालुक्यातील सिरंजणी व इतर गावांतील काही रुग्णांना उपचारासाठी नांदेड किंवा थेट विदर्भातील रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागल्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे वेळ, पैसा आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची धक्कादायक माहिती सिरंजणी येथील जागरूक युवा कार्यकर्ता पवन करेवाड यांनी दिली आहे.



दरम्यान, नगरपंचायत व आरोग्य विभागाकडून मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण, लसीकरण व नसबंदी मोहीम प्रभावीपणे राबवली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. रेबीजसारखा प्राणघातक आजार रोखण्यासाठी आवश्यक लस वेळेत उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर हिमायतनगर ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच तालुक्यातील उपआरोग्य रुग्णालयांमध्ये रेबीज लसीच्या तुटवड्याबाबत आरोग्यमंत्री, आरोग्य संचालक आणि नांदेड जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. लसअभावी रुग्णांची होणारी हेळसांड तात्काळ थांबवावी व पुरेसा लसीचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी सिरंजणी येथील सरपंच सौ. मेघा पवन करेवाड यांनी पत्राद्वारे केली आहे.

रेबीज हा अत्यंत जीवघेणा आजार असून, वेळेत उपचार न मिळाल्यास जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने रेबीज लस उपलब्ध करून द्यावी, मोकाट कुत्र्यांवर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवावी तसेच चावा घेतलेल्या नागरिकांसाठी तात्काळ उपचार व्यवस्था सुरू करावी, अशी जोरदार मागणी हिमायतनगरकर नागरिकांकडून होत आहे. कोणतीही दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी प्रशासन जागे होणार का? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

