किनवट,परमेश्वर पेशवे। बेंदीतांडा शिवारातून अवैध मुरूम वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर्स शुक्रवारी महसूल विभागाच्या पथकाने पकडून किनवट तहसिल कार्यालयात लावले आहेत. परंतू उत्खनन करुन ट्रॅक्टर भरुन देणार्या जेसीबीवर मात्र पथक मेहरबान झाल्यामुळे प्रत्यक्ष दर्शीतांमध्ये उलटसुलट चर्चाला उधान आल्याचे दिसते. मोहपूर येथे एक आणि पाटोदा येथेही रेतीचे ट्रॅक्टर पकडून कारवाई केली.

पैनगंगेतील रेतीचा मोहपूर येथे मोठ्या प्रमाणात चोरीचा व्यवसाय चालतो. एखादे ट्रॅक्टर धरुन चालणार नाही. तर खरबी अभयारण्य प्रशासनाशी संपर्क साधून कायमचा रेती उपसा थांबवायला हवा. अशी नेहमीचीच मागणी आहे. सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली व तहसिलदार शारदा चौंडेकरांच्याच कार्यकाळात रेती, दगड, मुरुमाचा अवैध व्यवसाय थांबऊ शकतात असे सद्याच्या धडक मोहिमेवरुन दिसते.


बेंदीतांड्यातील अवैध मुरुम वाहतूक करीत करतांना महसुलच्या भरारी पथकातील मंडळ अधिकारी जयराम गाडे, मंडळ अधिकारी दंतुलवाड, सिंगेवार, तलाठी प्रियंका डुकरे, सिंधु आत्राम, सचिन धुमाळे, यू.आर.जाधव यांनी कारवाई केली. जेसीबीवर कारवाई का नाही ? हातानेच खोदकाम आणि हातानेच ट्रॅक्टरमध्ये मुरुम भरला का ? असा सवाल आहे.


तलाठी रमेश अंकमवार आणि गौतम पांढरे यांनी पाटोदा येथून रेतीचे ट्रॅक्टर पकडले. मोहपूर येथे रेती तस्करीचा मोठा अड्डा सक्रीय आहे. खरबी वनविभागाचे कांही कर्मचारी, किनवट महसूलचे कांही कर्मचारी आणि रेती तस्कर यांच्यात समन्वय असल्यामुळे अगदी बेडरपणाने रेती व्यवसाय चालतो. जवळपास पंधरा ट्रॅक्टर्स रात्रंदिवस चालतात. लोकांची ओरड कमी करण्यासाठी अधूनमधून एखाद्या ट्रक्टरवर कारवाई करुन तस्करीला प्रोत्साहन देत असल्याच्या प्रचंड तक्रारी आहेत. बेंदीतांड्यात काल मुरुमाची अवैधपणे वाहतूक करतांना नव्हे तर उत्खननाच्या ठिकाणावरच महसूल पथकाने छापा टाकला.

गोकुंदा येथिल अवैध व्यवसाय करणार्या एका इसमाजवळ असलेल्या जेसीबीने खोदकाम करुन ट्रॅक्टर भरुन दिले जात होते. रंगेहात पकडल्यानंतर जेसीबी सोडण्यामागचा उद्देश अगदी स्पष्ट दिसत आहे. तरीसुद्धा तलाठी जाधवांशी पुन्हा पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी मुळीच माहिती देण्याचे सहकार्य केलेले नसल्याने जेसीबी सोडण्यात आलेल्या चर्चेला एकप्रकारे पुष्ठी बसत आहे. जेसीबी आज जरी सोडली असली तरी चौकशी करुन जेसीबी जप्त करावी लागेल. अधिकाराचा गैरवापर प्रकरणी कारवाई व्हायला पाहिजे. नाहीतर कांही सामाजिक कार्यकर्ते उपोषणाचा मार्ग अवलंबणार असल्याचे सांगण्यात आले.

