नांदेड| नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी व ढगफुटीमुळे बाधीत झालेल्या शेतकर्यांच्या शेतीचे व ईतर नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून शेतकर्यांना प्रतिहेक्टरी 50 हजार रूपयाची नुकसान भरपाई देवून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) नांदेड जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी निवेदन देवून केली आहे.


जून ते सप्टेंबर 2025 दरम्यान झालेल्या ढगफुटी व मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी होवून खरीप हंगामातील शेती बाधीत झाली असून शेतातील सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस, हळद, केळी, फळबाग पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच अनेकांच्या घराची पडझड झाली आहे. पावसामुळे जमिनी खरडून गेलेल्या आहेत तसेच गुरे, ढोरे, वाहून गेल्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासन निर्णय क्रमांक सीएलएस- 2022/प्र.क्र.297/म-3 नुसार शासनाने प्रचलित दरावून अधिक मदत वाढीचे दर निश्चित केले आहे.

त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर, 3 हेक्टर पर्यंतची मर्यादा 13 हजार 600 रूपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 27 हजार/3 हेक्टरच्या मर्यादेत, बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 36 हजार/3 हेक्टरची मर्यादा असे निश्चित केले आहे. त्यामुळे शेतकर्यांना प्रति हेक्टर 50 हजार रूपये नुकसान भरपाई देवून ओला दुष्काळ जाहीर करावा व 8 सप्टेंबर 2022 च्या जीआर प्रमाणे पुरग्रस्तांना नुकसानीचे वाटप करावे असे दिलेल्या निवेदनात मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी केली आहे.



