हिमायतनगर | पालकांनी आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे वेळेवर लक्ष दिल्यास मुलगा-मुलगी शिक्षणात उत्तुंग भरारी घेऊन स्वतःसह आई-वडिलांचे नाव उज्वल करू शकतात, असे प्रतिपादन चेतना शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका श्रीमती शकुंतलाबाई बाबाराव एबडवार यांनी केले.


जिल्ह्यातील सावळी येथील शेतकरी आबाराव संगनोड यांनी प्रतिकूल परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती आणि अडचणींना तोंड देत आपल्या मुला-मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. त्यातून एक मुलगा नांदेड शहरात तज्ज्ञ डॉक्टर तर दुसरा मुलगा पुण्यासारख्या महानगरात स्वतःची कंपनी स्थापन करत आहे, ही बाब पेरकेवार समाजासाठी आदर्शवत व अभिमानास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.

आजही शेतकरी वर्गास अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीतही पाल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे हीच खरी गुंतवणूक असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या समाजातील अनेक होतकरू विद्यार्थी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर शासकीय सेवेत दाखल होत असल्याची संख्या वाढत आहे, ही कौतुकास्पद बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.


आबाराव संगनोड यांचे सुपुत्र डॉ. प्रदीप संगनोड हे नांदेड शहरात आर्थोपेडिक (हाडरोग) तज्ज्ञ म्हणून नावारूपाला आले असून रुग्णांकडून त्यांच्या सेवेबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. तसेच हिमायतनगर तालुक्यातील आदर्श गाव टेंभी येथील रहिवासी, तामसा पोलीस स्टेशनचे पोलीस जमादार अशोकराव सिंगनवाड यांची कन्या डॉ. सौ. आश्लेषा प्रदीप संगनोड या स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. प्रदीप संगनोड व डॉ. आश्लेषा संगनोड या जोडगोळीने नांदेड शहरात वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत रुग्णसेवेत आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल पेरकेवार समाजबांधवांसह रुग्णांकडूनही मोठ्या प्रमाणात गौरव करण्यात येत आहे. यावेळी मराठवाडा अध्यक्ष गजानन तिप्पनवार रड्डी, बालाजी दादा कंदलवाड, प्रा. लक्ष्मण कोतापल्ले, दिलीप अनगुलवार, दिनेश डुमनवार, गोविंद ऊल्लेवाड, किशनराव अनगुलवार, नगरसेवक शंकरराव चिंतलवाड, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त संभाजी आलेवाड यांच्यासह अनेक मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते.

