नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील कालपासून वातावरणात बदल झाला असून, काही भागांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असून, रब्बी हंगामातील उर्वरित पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात दुपारी ४४ अंश सेल्सिअस तापमान असल्याने प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत होता. दरम्यान, बुधवारी सायंकाळी अचानकपणे विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावून नांदेड शहर व परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढलं. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. परंत्तू शहरात महानगरपालिकेच्या दुर्लक्षित कारभाराचे पितळे उघडे पडले असून, जिकडे तिकडे तळे साचल्याने नागरिकांना घाण पाण्यातून मार्ग काढावा लागला असल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे.

म्हैस दगावल्याने दिगाबर लिंगणा काईतवाड या शेतकऱ्याचे अंदाजे 1 लाख रुपयाचे नुकसान
गुरुवारी नांदेड जिल्ह्यातील किनवट, हिमायतनगर तालुक्यात विजांचा कडकडाट होऊन वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला. हिमायतनगर तालुक्यातील यात बोरगडी येथे गट क्रमांक 174 मध्ये वीज कोसळून एक दुभती म्हैस दगावल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. दररोज १० लिटर दूध देणारी म्हैस दगावल्याने दिगाबर लिंगणा काईतवाड या शेतकऱ्याचे अंदाजे 1 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी केली जात आहे.


कृषी दुकानात खते, बी-बियाणे खरेदीसाठी गर्दी
मृग नक्षत्र एका दिवसावर येऊन ठेपला असताना पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. वातावरण बदलताच शहरातील कृषी दुकानात शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली असून, पेरणीच्या तयारीसाठी खते, बी-बियाणे खरेदीची तयारी सुरु आहे. मात्र शेतकऱ्यांना हव्या त्या कंपनीचे बियाणे मिळत नसल्याची ओरड होऊ लागली असून, याकडे कृषी विभागाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना रास्त भावात कृषी साहित्य उपलब्ध होतील याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.


