हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील घारापुर फाटा ते बोरी मार्गावर रस्ता पार करणाऱ्या एका गाभण हरिणीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याची घटना ०३ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. यात गाभण हरिणीचा जागीच मृत्यू झाला असला तरी पोटातील हरिणीचे पाडस सुखरूप बाहेर पडले आहे. हा प्रकार लक्षात येताच येथील सामाजिक कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी पाडसाला वनविभागाच्या ताब्यात दिले असून, मयत हरिणाच्या प्रेताची शासकीय नियमाप्रमाणे विल्हेवाट लावण्यात आली आहे.


सध्या हिमायतनगर शहर व तालुक्यात उष्णतेचा पारा ४३ अंशापेक्षा अधिक वाढला असून, अंगाची लाही लाही होत आहे. घारापुर, हिमायतनगर, पळसपूर भागातील पैनगंगा नदी पात्रात आणि जंगलातील पाणवठ्याच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने मुकी जनावरे, पशु पक्षी आणि वन्य प्राणी पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करत आहेत. अश्याच प्रकारे पाण्याच्या शोधात रानोवन भटकंती करणारे एक गाभण हरीण आपल्या काळापासह हिमायतनगर, सरसम शिवाराच्या पैनगंगा नदीकाठी असलेल्या घारापुर फाटा परिसरात आले होते. दरम्यान कुठेच पाणी मिळत नसल्याने हरिनाचे कळप रस्ता ओलांडून पैनगंगा नदीकडे जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनांची जबर धडक गाभण हरिणीला बसली. या घटनेत सिमेंट काँक्रेटच्या रस्त्यावर हरिणी एवढ्या जोरात आदळून पडली कि तिच्या पोटातील चिमुकले पाडस सुखरूप बाहेर पडले मात्र हरीणीच्या जागीच मृत्यू झाला.


हा प्रकार येथील ढाबा चालक रामदास रामदीनवार व त्यांच्या सहकारी आणि परिसरातील शेतकऱ्यांना लक्षात येताच घटनेची माहिती पत्रकारांना तसेच वनविभागाला दिली. आणि मयत हरीणीच्या चिमुकल्या पाडसांस उन्हाचे चटके बसण्यापूर्वी उचलून सुखरूप हिमायतनगर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात आणून स्वाधीन केले. वेळेवर वन्यप्रेमी नागरिकांनी हरीणीच्या पाडसाला सुखरूप उचलून आणल्याने जीवदान मिळाले आहे. याबद्दल वन विभागातील अधिकाऱ्यांनी वन्यप्राण्याबद्दल आपुलकी दाखविणाऱ्या नागरिकांचे कौतुक करून अभिनंदन केले. तात्काळ मयत हरीणीच्या प्रेताचा वनविभाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित होऊन पंचनामा करत प्रेताची शासकीय पद्दाथीने विल्हेवाट लावली आहे.

पाणवठे आटल्याने तीन दिवसात दोन हरणाचे अपघाती मृत्यू
नुकतेच नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावरील हिमायतनगर शहराजवळील एका विहिरीत पाण्याच्या शोधात आलेल्या हरिनाचा पडून मृत्यू झाला होता. याची माहिती मिळताच तात्काळ वनविभागाचे कर्मचारी यांनी उपस्थित होऊन विहिरीत पडलेल्या हरीनाला बाहेर काढून विल्हेवाट लावली. हि घटना ताजी असताना शनिवारी पुन्हा एका हरिनाचा अपघातात मृत्यू झाला असून, हरिणीचे पाडस सुखरूप आहे. हिमायतनगर शहर व तालुक्यात पाण्याची पातळी कमी झाल्याने पाणवठे आटू लागल्याने वन्यप्राणी सैरवैर झाले आहेत. हि बाब लक्षात घेता वनविभागाने पाणवठ्यामध्ये टैन्करद्वारे नित्यनेमाने पाणी पुरवठा करून वन्य प्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवून संभाव्य अपघात टाळावे अशी मागणी वन्यपेमी नागरिकांनी केली आहे.

आमचे कर्मचारे नवजात पाडसाची देखरेख करताहेत
याबाबत वनविभागातील संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असताना वनविभागाने ठिकठिकाणी पाणवठे केलं, त्यात पाणी टाकले जात आहे. जंगलातील झंडाची पानगळ झाल्यानं सावली नसल्याने वन्यप्रेमी भटकत आहेत. आजच्या अपघातातील हरिनाचे पाडस सुखरूप असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खर्चातलेल्या ठिकाणी मलम पट्टी केली आहे. सध्या दुधड येथील नर्सरीत आमचे कर्मचारे पाडसाची देखरेख करत वेळेवर दूध पाणी देत आहेत अशी माहिती वनपाल यांनी दिली.