नांदेड, हदगाव, हिमायतनगर। नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर मतदार संघात निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाई संदर्भात हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिनांक 05 मे रोजी हदगाव येथील पंचायत समिती कार्यालयात दुपारी 12 वाजता अधिकारी, कर्मचारी यांची आढावा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमुळे मतदार संघातील जनतेची पाण्यासाठी होणारी थांबण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.


पैनगंगा नदीकाठी असलेल्या हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील नदीकाठी असलेल्या गावात आणि प्रमुख दोन्ही शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. हिमायतनगर येथे तर महिलांनी नगरपंचायत वर घागर मोर्चा काढून पाणी समस्या सोडवण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात दोन तास ठिय्या मांडल्या होत्या. शहरातील जवळपास सर्वच प्रभागात सार्वजनिक व खाजगी बोरवेकलचे पाणी बंद झाले आहे. उष्णतेचे वाढते प्रमाण यामुळे नागरिक हंडाभर पाण्यासाठी सर्व काम सोडून पाणी असलेल्या ठिकाणी ताटकळत बसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.


पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले असतांनाप्रशासकीय यंत्रणा याकडे डोळेझाक करत आहे, हदगाव हिमायतनगर तालुका दुष्काळग्रस्त क्षेत्र आहे. त्यामुळे येथे पाणी व्यवस्थापनासाठी कोट्यवधी रुपयांची नळ योजना मंजूर झाली, मात्र ती अर्धवट अवस्थेत असल्याने कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिक तहानलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे येथील पाणी व्यवस्थापनाचे नियोजन होणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार नागेश पाटिल आष्टीकर यांनी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांना मतदार संघातील दोन्ही तालुक्यांतील पाणी टंचाई आढावा बैठक ५ मे रोजी लावण्याची सूचना दिली होती.

त्यानुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीत गटविकास अधिकारी, तहसीलदार मुख्याधिकारी, उपविभागीय अभियंता पाणी पुरवठा, सर्व तलाठी, ग्रामसेवक आणि टंचाई शी संबंधित सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार असून, खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी बोलाविलेली पाणी टंचाई आढावा बैठक टंचाईवर मात करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. पाण्याची आवश्यकता जास्त आणि स्रोत कमी अशी स्थिती सध्या निर्माण झाली असून, त्यामुळे बैठकीमध्ये पाणी व्यवस्थापनाचा उपाय, पाणीबचत आणि पाणी पुनर्वापर यासारख्या विविध विषयांवर चर्चा, पाण्याचे योग्य व्यवस्थापन या विषयांवर होणार चर्चा होणार आहे.
