हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर जवळच्या रेल्वे गेटच्या उड्डाण पुलाचे काम थंडबस्त्यात पडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. रेल्वे येत असल्याने फाटक लावले कि रेल्वे जाईपर्यंत वाट पाहावी लागते आहे. यामुळे गंभीर रुग्णांना नांदेड सारख्या शहराकडे नेताना मोठ्या परिणामाला सामोरे जाण्याची वेळ अनेक रुग्णांवर आली आहे. हि बाब लक्षात घेता तात्काळ येथील उड्डाण पुलाचे काम पूर्ण करून राखलेला रास्ता पूर्ण करावा अशी मागणी प्रवाशी नागरीकातून पुढे येत आहे.
हिमायतनगर- भोकर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिमायतनगर शहराजवळील रेल्वे फाटक रस्त्यावर उड्डाण पूल मंजूर झाला. या रस्त्याचे काम जवळपास दोन्ही बाजूने पूर्ण होऊन अनेक वर्ष लोटली मात्र उड्डाण पुलाचे काम काही झाले नाही. त्यामुळे येथील रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले असून, येथून ये – जा करताना रस्त्यात खड्डा आहे कि… खड्ड्यात रस्ता हे कळणे अवघड बनले आहे. एव्हढेच नाहीतर उड्डाण पूल झाला नसल्यामुळे रेल्वे जाईपर्यंत नागरिकांना ताटकळत बसावे लागते आहे. एखादी गंभीर बाब असल्यास रेल्वे जाईपर्यंत रुग्णवाहिका व अन्य महत्वपूर्ण व्यक्तींचा वेळ वाया जात आहे. यामुळे मोठ्या परिणामाचा सामना करण्याची वेळ वाहनधारक नागरिकांवर आली आहे.



केवळ उड्डाण पुलाचे काम झाले नसल्यामुळे रेल्वेगेटच्या दोन्ही बाजूने हजार मीटर पर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून, पावसाळ्यात चिखल आणि आता उन्हाळ्यात धुळीचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाने या जीवघेण्या रस्त्याकडे लक्ष देऊन आगामी उन्हाळा व पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी तात्काळ खड्डे बुजवून संभाव्य धोका टाळावा आणि लवकरात लवकर येथील मंजूर उड्डाण पुलाचे काम करून रेल्वे जाईपर्यंत जनतेला ताटकळत बसण्याची वेळ येणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी केली जाते आहे.
