नांदेड| आजच्या काळात प्रामाणिकपणा हा दुर्मिळ होत चाललेला गुण असला तरी अजूनही काही व्यक्ती आपल्या कर्तव्यदक्षतेने आणि चारित्र्याने समाजात आदर्श ठरत आहेत. याचे प्रत्यंतर २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता नांदेडमध्ये आले.


टायगर ऑटो रिक्षा चालक संघटनेचे सदस्य नसीर खान नदिम खा (रा. शिवाजी नगर, नांदेड) आपल्या दैनंदिन कामाप्रमाणे प्रवासी घेऊन जात होते. त्याच वेळी प्राचार्य शिल्पा कनवार (रा. पावडेवाडी नाका, नांदेड) एमजीएम कॉलेज नमस्कार चौक येथे जाण्यासाठी त्यांच्या रिक्षामध्ये बसल्या. प्रवास संपल्यानंतर त्या उतरताना त्यांचा विवो कंपनीचा २०,००० रुपये किमतीचा मोबाईल रिक्षामध्ये राहिला.


दोन तासानंतर शिल्पा कनवार यांनी संपर्क साधला असता रिक्षा चालक नसीर खान यांनी मोबाईल सुरक्षित असल्याची माहिती दिली. त्यांनी लगेचच ही बाब टायगर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अहमद (बाबा) यांच्यापर्यंत पोहोचवली. पुढे अहमद (बाबा) यांनी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व विमानतळ पोलीस निरीक्षक कामठेवाड यांना माहिती दिली.


कामठेवाड याच्या मार्गदर्शनाखाली शिल्पा कनवार यांना पोलीस स्टेशन येथे बोलावून नसीर खान यांनी मोबाईल परत केला. या वेळी पोलीस निरीक्षक कामठेवाड साहेब, टायगर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अहमद (बाबा), पोलीस उपनिरीक्षक जाधव साहेब, शहर सहसचिव गंगाधर सरोदे, कोषाध्यक्ष धम्मपाल थोरात, कार्याध्यक्ष संजय शेळके उपस्थित होते.

मोबाईल परत मिळाल्याबद्दल शिल्पा कनवार यांनी आनंद व्यक्त करत नसीर खान यांना २०० रुपये बक्षीस दिले. तसेच उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी टायगर ऑटो रिक्षा चालक संघटनेच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून नसीर खान यांचे अभिनंदन केले. ही घटना समाजात प्रामाणिकपणाचा आदर्श ठेवणारी ठरली आहे.


