हिमायतनगर, अनिल मादसवार| केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गांच्या विकासाबाबत मोठमोठे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात भोकर–किनवट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वरील परिस्थिती वेगळीच असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्रीदत्त पाटील सोनारीकर यांनी केला आहे.


सुमारे पाच वर्षांपूर्वी या महामार्गाची निर्मिती झाल्यानंतर अल्पावधीतच रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या. काही ठिकाणी सिमेंट काँक्रीट उखडून गेल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, महामार्गालगत असलेल्या गावांच्या मुख्य स्टॉपवर स्पीड ब्रेकर, डिव्हायडर तसेच आवश्यक सुरक्षा सूचना फलकांचा अभाव असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.


रस्त्यावर पडलेल्या भेगा व इतर दुरुस्तीसाठी गुजरातमधील KCC कंपनीला मेंटेनन्सचे काम देण्यात आले असल्याचे सांगितले जाते. मात्र संबंधित ठेकेदाराकडून सुरू असलेले दुरुस्तीचे कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. दुरुस्ती केल्यानंतरही रस्त्याची अवस्था सुधारत नसल्याने सार्वजनिक पैशांचा अपव्यय होत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.




रस्ता अर्धवट, मात्र टोलवसुली सुरू? – महामार्गाचे काम पूर्णपणे झालेले नसतानाही सोनारी नजीक टोल प्लाझा सुरू करून वाहनचालकांकडून टोलवसुली केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे सुविधा अपुऱ्या असताना टोल कशासाठी? असा सवाल वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. टोल गेटच्या ठिकाणी सुलभ शौचालय व इतर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसत आहेत. तसेच महामार्गाच्या कामासाठी रस्त्याच्या दुतर्फे असलेली मोठ्या प्रमाणातील झाडे तोडण्यात आली. मात्र त्यानंतर अपेक्षित प्रमाणात नवीन वृक्षलागवड करण्यात आली नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे रस्ते विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सुरक्षेअभावी अपघातांचा धोका वाढला – महामार्गावरील अनेक गावांच्या स्टॉपजवळ गतिरोधक नसणे, डिव्हायडर व सुरक्षा फलकांचा अभाव आणि भरधाव वाहतूक यामुळे वाहने समोरासमोर येण्याच्या घटना घडत आहेत. या मार्गावर दररोज अपघात होत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते श्रीदत्त पाटील सोनारीकर यांनी केला आहे. अपघात- ग्रस्तांसाठी आवश्यक असलेली रुग्णवाहिका सेवा उपलब्ध नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महामार्गाची दुरवस्था, निकृष्ट दर्जाची दुरुस्ती, अपुऱ्या सुरक्षा उपाययोजना, अर्धवट काम आणि टोलवसुली या सर्व प्रकाराला राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या यंत्रणेचे कुचकामी नियोजन कारणीभूत असल्याचा आरोप श्रीदत्त पाटील सोनारीकर, शेख युनूस सोनारीकर यांनी केला आहे.

महामार्गावरील भेगा व खड्डे तातडीने दुरुस्त करावेत, गावांच्या मुख्य स्टॉपवर गतिरोधक व सुरक्षा फलक बसवावेत, आवश्यक ठिकाणी डिव्हायडरची व्यवस्था करावी, रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून द्यावी आणि निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. महामार्गाचा दर्जा आणि प्रवाशांची सुरक्षितता याबाबत प्रशासन आता तरी गांभीर्याने दखल घेणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

