Wednesday, May 13

Khurgaon is playing the initiation ground of Shramners : खुरगावला साकारत आहे श्रामणेरांची दीक्षाभूमी -NNL

नांदेड| महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर मुक्कामी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी या देशातील तमाम अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या आणि हक्क वंचितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. भारतात या घटनेमुळे बौद्ध धम्माला पुनर्जीवन मिळाले. त्यानंतरच्या काळात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. आजही तो सुरू आहे. खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राची स्थापना झाल्यानंतर भदंत पंयाबोधी थेरो यांच्या नेतृत्वाखाली धम्मचळवळीने वेग घेतला आहे. या प्रशिक्षण केंद्रातून शेकडो उपासक उपासिका आणि बालक आणि स्त्रियांनी श्रामणेर दीक्षा घेतली आहे. अल्पावधीतच हे प्रशिक्षण केंद्र श्रामणेरांची दीक्षाभूमी म्हणून नावारुपाला आले आहे.

तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील हे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र दीक्षा विधी साठी वर्षभर सुरू असते. या ठिकाणी दरमहा दहा दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येते. येथे नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यातील हजारो श्रद्धावान उपासक उपासिका भेट देतात. यांच्या दानातूनच प्रशिक्षण भवन व भिक्खू निवासाची बांधणी करण्यात आली आहे. दशलक्ष रुपयांची अखंड पाषाणातील आशिर्वाद मुद्रेतील संगमरवरी मूर्ती याच परिसरात कोरण्यात आली आहे. अत्यंत रमणीय बनलेल्या या परिसरास विविध क्षेत्रातील अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण केंद्रास भेट दिली आहे. मोठ्या प्रमाणावर येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे.

SAVE 20240812 101939 Khurgaon is playing the initiation ground of Shramners : खुरगावला साकारत आहे श्रामणेरांची दीक्षाभूमी -NNL

रक्तदान व आरोग्य शिबीराचेही या ठिकाणावर आयोजन केले जाते. भोजनदान आणि प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. दरमहा पौर्णिमेचे औचित्य साधून पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे. याच परिसरात जवळपास साडेतीन कोटी रुपये खर्चाचे बांधकाम सुरू आहे. यात भव्य विपश्यना व ध्यानसाधना केंद्र, भोजनगृह, प्रार्थनाकेंद्र, भव्य वाचनालय व ग्रंथालय भिक्खू संघाच्या निवासाची सोय आदींचे संकल्पित बांधकाम होत आहे.

यामुळे धम्मचळवळीला अधिक गती मिळेल असा विश्वास धम्मगुरु भदंत पंयाबोधी थेरो यांना वाटतो. या कामासाठी राजकीय, संस्थात्मक वा धार्मिक संघटनांकडून किंवा इतर कोणत्याही स्रोतांकडून मदत न स्वीकारता उपासकांच्या निढळाच्या घामातून मिळालेल्या आर्थिक दानावरच या दीक्षाभूमीची उभारणी झाली पाहिजे असा त्यांचा मानस आहे. या निमित्ताने शहर व परिसरातील बौद्ध उपासक उपासिकांना आर्थिक दान करण्याचे आवाहन पंयाबोधी थेरो यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!