नांदेड, अनिल मादसवार | गेल्या आठवडाभरात नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक गावांचा जनसंपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी गुरे-वासरे वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सर्व परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.


अशा स्थितीत शासनाने तात्काळ पावले उचलून पूरग्रस्त भागातील पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी तसेच समस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी ठाम मागणी प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात आली आहे.


ही मागणी जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी विठ्ठल कल्याणकर (जिल्हाप्रमुख), प्रीतपाल सिंह शाहू (नांदेड महानगर प्रमुख), अनिल कदम (हदगाव तालुका प्रमुख) आणि दत्तराव देशमुख (हिमायतनगर तालुका प्रमुख) यांनी एकत्रितपणे केली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाला विनंती केली आहे की, शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने मदत कार्य सुरू करून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढावा.



