उस्माननगर, माणिक भिसे। मागील अडीच वर्षात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाअतंर्गत जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असून गट व समूह समन्वयक कर्मचाऱ्यांना मानधन १३ हजारांवरून २५ हजार करण्यात आले. त्याचप्रमाणे राज्यातील ६१४ गट व समूह समन्वयक कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

यावेळी मानधन वाढविल्याबद्दल मंत्री गुलाबराव पाटील यांचा दि.७ जुलै रोजी जळगाव येथे संघटनेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी संघटना यांची रविवारी जळगाव येथे वार्षिक राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यातील सर्व गट संसाधन केंद्रातील गट समन्वयक व समूह समन्वयक कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटनेचे राज्याध्यक्ष विलास निकम,राज्य सचिव जयंत वर्मा, राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष व सचिव आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन जितेंद्र महाजन व शिरीष तायडे यांनी केले. प्रास्ताविक राज्याध्यक्ष विलास निकम यांनी केले. आभार जिल्हाध्यक्ष सपना राजपूत यांनी मानले. या मेळाव्याला नांदेड, परभणी,हिंगोली,लातूर आदीसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.



