नांदेड l अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या निकषांमध्ये डिसेंबर २०२४ मध्ये वयोमर्यादेची अट समाविष्ट करण्यात आली आहे. मात्र, चालू शैक्षणिक वर्षात डिसेंबरपूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना जुन्या निकषांनुसार लाभ देण्याची मागणी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे केली आहे.

डिसेंबर २०२४ मध्ये सामाजिक न्याय विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयान्वये स्वाधार योजनेच्या निकषांमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. यामध्ये ३० वर्षांच्या वयोमर्यादेचा समावेश आहे. परंतु, या शासन निर्णयापूर्वी अनेक विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज केले होते. हा शासन निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होत नसल्याने, चालू शैक्षणिक वर्षात विहित मुदतीत अर्ज करणाऱ्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे लाभ जुन्या निकषांनुसार द्यावेत, अशी मागणी आ. श्रीजया चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात काही विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे आपली बाजू मांडली होती. विद्यार्थ्यांचे म्हणणे रास्त वाटल्याने त्यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना पत्र लिहून ही मागणी नोंदवली आहे.


