नांदेड| तेलंगणातील श्रीराम सागर धरणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी बाभळी बंधाऱ्यात रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न (Every effort to prevent water from flowing into Babali dam) करेल, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. आ. श्रीजया चव्हाण यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते.

विखे पाटील पुढे म्हणाले की, श्रीराम सागर धरणाची साठवण क्षमता ११२ टीएमसी आहे. मात्र एकिकडे या धरणातून साधारणतः २०० टीएमसी पाणी समुद्रात वाहून जात असताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे महाराष्ट्राला अवघी पावणे दोन टीएमसी साठवण क्षमता असलेल्या बाभळी बंधाऱ्यात २८ ऑक्टोबरपूर्वी पाणी अडवता येत नाही. ही मोठी विसंगती आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले आहे.

आ. श्रीजया चव्हाण यांनी मांडलेल्या सूचनेप्रमाणे बाभळी बंधाऱ्याचे पाणी अडवण्यासाठी तेलंगणा सरकारची चर्चा करणे, केंद्रीय जल आयोगाकडे महाराष्ट्राची भूमिका मांडणे व सर्वोच्च न्यायालयात जाण्यासंदर्भात महाधिवक्त्यांचा सल्ला घेतला जाईल, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.


भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण व देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी आपली भूमिका मांडताना आ. श्रीजया चव्हाण म्हणाल्या की, बाभळी बंधाऱ्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे ६ हजार ५०० हेक्टर क्षेत्राला सिंचन मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १ जुलै ते २८ ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्राला बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे बंद करता येत नाही. अनेकदा श्रीराम सागर धरण २८ ऑक्टोबरपूर्वीच पूर्ण भरते. त्यानंतर बाभळीतून पुढे जाणारे पाणी श्रीराम सागर धरणातून समुद्रात वाहून जाते. या पार्श्वभूमिवर २८ ऑक्टोबरपूर्वी श्रीराम सागर धरण भरले तर बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे बंद करण्याची अनुमती मिळावी, यासाठी राज्य सरकारने सर्व उपलब्ध पर्यायांचा विचार करण्याची मागणी आ. श्रीजया चव्हाण यांनी केली.


