Wednesday, May 13

Elders, let’s go to the pilgrimage! ज्येष्ठांनो चला… तीर्थ दर्शनाला ! – NNL

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी, अर्थात ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा व्यक्तींसाठी राज्य शासनाने भारतातील तीर्थक्षेत्रांना यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. योजनेचे नाव आहे “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” यासाठी अर्ज करण्याची अंतीम तारीख 31 ऑगस्ट आहे. या योजनेसाठी 60 वर्षावरील नागरिकांनी सहायक आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल करायचे आहेत. 30 हजार रुपयापर्यंत या योजनेतून लाभ दिला जाणार आहे.

कशी आहे योजना ?
भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती 30 हजार इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ. सर्व बाबींचा समावेश असेल.

कोणाला लाभ मिळणार ?
या योजनेच्या लाभासाठी महाराष्ट्र राज्यातील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. त्याचे वय वर्षे 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिक असावे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे. अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. (हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसांपेक्षा जास्त जुने नसावे).

असा करा अर्ज
या योजनेचा लाभ मिळण्याकरिता ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्जासोबत लाभार्थ्याचे आधार कार्ड, रेशनकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. (लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र/शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र, प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल). सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयापर्यंत असणे अनिवार्य) किंवा पिवळे, केशरी रेशनकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक तसेच सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्या बाबतचे हमीपत्र आवश्यक राहील. मोबाईल ॲपवर, सेतू केंद्रात हा अर्ज करता येईल. अर्जदाराला यासाठी स्वत: उपस्थित रहाणे आवश्यक आहे. ॲानलाईन फोटो यासाठी हवा आहे.

यांना लाभ घेता येणार नाही
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाहीत. तथापि 2.50 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. थोडक्यात अडीच लाखावरील उत्पन्न असणारे, गंभीर आजाराने ग्रस्त असणारे ज्येष्ठ नागरिक अपात्र ठरतील.

अशी होणार लाभार्थ्यांची निवड
जिल्हास्तरीय समिती लाभार्थ्यांची निवड करेल. अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल, विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे (लॉट्सचे संगणकीकृत ड्रॉ) प्रवाशांची निवड केली जाईल.

प्रवास प्रक्रिया
जिल्हास्तरीय समितीने निवडलेल्या प्रवाशांची यादी आयुक्त, समाज कल्याण पुणे यांचेकडे सुपूर्द केली जाईल. निवडलेल्या प्रवाशांची यादी प्रवासासाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी / एजन्सीला देण्यात देईल. नियुक्त अधिकृत टुरिस्ट कंपनी/एजन्सी टूरवरील प्रवाशांच्या गटाच्या प्रस्थानाची व्यवस्था करेल. प्रवाशांच्या प्रवासासाठी आवश्यक त्या सुविधा आणि कोणत्या सुविधा देण्यात याव्यात याचा निर्णय राज्य शासन घेईल. सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठी नियोजित स्थळी त्यांच्या स्वखर्चाने पोहोचावे लागेल.

अर्ज करण्याची प्रक्रिया
योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल अॅपद्वारे, सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल. समाज कल्याण विभागातही अर्ज करता येईल. अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि केवायसी करता येईल. यासाठी अर्जदाराने कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड), स्वतःचे आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर, पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल, अॅपवर जाहीर केली जाईल. पात्र अंतिम यादीतील अर्जदार दुर्देवाने मयत झाल्यास सदर अर्जदाराचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल.

75 वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकाला नेण्यास परवानगी
75 वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल. अर्जदाराने त्याच्या अर्जात तसे नमूद करणे आवश्यक आहे. 75 वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असले तरीही प्रवासी सहाय्यक अर्जदारासोबत प्रवास करू शकेल.

थोडक्यात योजना
लाभार्थ्याचे वय 60 वर्षे पूर्ण असावे. लाभार्थ्याचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा कमी असावे जास्त नसावे. रहिवासी प्रमाणपत्र. आधार कार्ड/मतदान कार्ड. इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा, ज्येष्ठ नागरीक प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.वैद्यकीय प्रमाणपत्र. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो. उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा पिवळे/केशरी रेशन कार्ड. जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर, हमीपत्र आवश्यक आहे.

लेखक……प्रवीण टाके, जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!