हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नदी–नाल्यातील तसेच उमट्यावरील शेतजमिनीतील पिके पाण्याखाली गेली आहेत. सलग पाण्यात राहिल्यामुळे कापूस, सोयाबीन, तुरीसह इतर पिके पिवळी पडून मर रोगाने ग्रासलेली दिसत आहेत.



सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरणी केली होती. मात्र, पावसाने उघडीप दिल्याने अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. अशातच पिके फुलावर आली असतानाच निसर्ग कोपला. गेल्या सहा ते सात दिवस सतत पाण्यात राहिल्यामुळे सोयाबीनच्या पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला असून, कापसावर लाल्या रोग वाढला आहे. तुरीची झाडे उभीउभी वाळू लागली आहेत.


या परिस्थितीमुळे शेतकरी राजा पूर्णपणे हतबल झाला आहे. यंदा फवारणीच्या खर्चाएवढेही उत्पादन निघेल की नाही, याबाबत शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत शासनाने द्यावी, तसेच कामचुकार कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.


कृषी विभागाविरोधात संताप
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, कृषी विभागाचे अधिकारी आणि कृषी सहाय्यक याकाळात मार्गदर्शन न करता केवळ पगारासाठी कार्यालयात येऊन सह्या करून वेळ घालवत आहेत. “उंटावरून शेळ्या हाकण्याचा कारभार सुरू आहे,” अशी टीका शेतकऱ्यांकडून होत आहे.
बैलपोळ्यावरही सावट
अतिवृष्टीच्या या संकटामुळे शेतकऱ्यांचा बैलपोळा सण साध्या पद्धतीने साजरा होत असून, उत्साहाऐवजी हताशतेचे वातावरण आहे. आतापर्यंत शासनाने कोणतीही मदत जाहीर न केल्यामुळे शेतकरी वर्ग शासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसला आहे.


