हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहर व तालुक्यातील शेत शिवारात केबल चोरट्यांचा सुळसुळाट थांबण्याचे नाव घेत नाही. सिरपल्ली भागातील चोरीच्या घटनेनंतर एकंबा परिसरातील नदीकाठच्या शिवारात सलग दुसऱ्या दिवशी तब्बल २० शेतकऱ्यांचे मोटारपंप केबल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आधीच अवकाळी पावसामुळे नुकसान सोसत असलेल्या शेतकऱ्यांवर आता चोरीच्या घटनांनी दुहेरी संकट ओढवले आहे. पिकांना पाणी देण्यासाठी आवश्यक असलेली मोटारपंप केबल चोरीला गेल्याने शेतीकाम ठप्प झाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

यापूर्वीही हिमायतनगरसह कारला, सिरपल्ली, पळसपूर, सवना, पिचोंडी आदी भागांत अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या होत्या. मात्र त्या प्रकरणांचा तपास अद्याप प्रलंबित असल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.



जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन विशेष पथक नेमावे, रात्री गस्त वाढवावी आणि केबल चोरट्यांच्या टोळीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.


दरम्यान, “पोलिसांच्या नाकावर टिचून चोरटे वारंवार मोटार पंपावर हल्ले करून केबल चोरी करत असताना शेतकऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार?” असा सवालही उपस्थित केला जात आहे. वाढत्या चोरीमुळे शेतकरी भयभीत असून प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी होत आहे.


