Thursday, May 21

Jawaharlal Nehru College ; जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात समाजकार्य शिक्षणातील संधी व आव्हाने या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र संपन्न

नवीन नांदेड l श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे, जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र सिडको, नवीन नांदेड. येथे समाजकार्य शिक्षणातील संधी व आव्हाने या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र घेण्यात आले.

कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.पाटील होते तर प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ.अंबादास मोहिते संस्थापक अध्यक्ष मास्वे संघटना हे होते तर विशेष उपस्थिती प्रा.डॉ.युसुफ बेन्नूर माजी प्राचार्य समाजकार्य महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर हे होते.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्व मान्यवरांच्या स्वागता नंतर प्रा.डॉ.अंबादास कर्डिले यांनी संपादित केलेल्या “महाराष्ट्रातील आदिवासी प्रश्न व आव्हाने” या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रा.डॉ.अंबादास मोहिते म्हणाले की समाजकार्यात अनेक प्रकारच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत पण त्या मिळवण्या साठी विद्यार्थ्यांनी मनापासून, प्रमाणिकपणे शिक्षण घेतले पाहिजे. समाजकार्य शिक्षणातील मूल्य, तत्व, तंत्र व कौशल्य आत्मसात केले पाहिजेत व स्वतःच्या क्षमता मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली पाहिजे तसेच विद्यार्थ्यांना स्वयंमूल्यांकन करता आले पाहिजे तेव्हाच तुम्ही स्पर्धेला सामोरे जाऊ शकाल विद्यार्थी वाचन, लिखाण करत नाहीत, गटचर्चा करत नाहीत, विविध कौशल्य आत्मसात केली पाहिजेत तसे होताना दिसत नाही, मोबाईल व टीव्ही पाहण्यात वेळ घालवता त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते व त्यामुळे यश मिळत नाही असे म्हणाले.

यानंतर विशेष उपस्थित असलेले प्रा.डॉ.युसुफ बेन्नुर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी होऊन चालणार नाही तर ज्ञानार्थी व्हावे लागेल आज जग झपाट्याने बदलत आहे तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे तो तुम्ही तुमच्या “स्व” विकाससाठी वापरावा, मोबाईल पाहण्यात वेळ घालवू नये त्यामुळे शारीरिक व मानसिक थकवा लवकर येतो व विविध समस्या मध्ये वाढ होते तसेच जागतिकीकरणामुळे आज विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत.

व्यक्ती व्यक्ती मधील संवाद कमी होत चालला आहे त्यामुळे वाद-विवाद वाढणे अविश्वासाचे वातावरण निर्माण होणे कुटुंबातील नातेवाईकांमधील संवाद सुद्धा खूप कमी झाला आहे त्यामुळे लोकांच्या मानसिक समस्यात वाढ झाली आहे. त्यासोबतच सायबर क्राईम सारखे नवीन गुन्ह्याचे प्रकार वाढले आहेत, जागतिक तापमान वाढीमुळे आरोग्याच्या समस्यांत वाढ झालेली आहे,आदिवासींच्या समस्या कमी झालेल्या नाहीत अशा विविध प्रकारची आव्हाने,समस्या समाजकार्य शिक्षणासमोर आहेत असे त्यांनी प्रतिपादन केले.

यानंतर अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.एन.जी.पाटील यांनी असे म्हटले की समाजकार्य शिक्षणात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत विविध क्षेत्रांमध्ये समाजकार्याच्या मनुष्यबळाची गरज आहे विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध केले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रस्ताविकप्रा.डॉ.अंबादास कर्डिले यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.गोपाळ बडगिरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.मेघराज कपूर यांनी मानले, कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ.मनीषा मांजरमकर,डॉ.दिलीप काठोडे,डॉ.विद्याधर रेड्डी,डॉ.प्रतिभा लोखंडे,डॉ.शिवाजी शिंदे,डॉ.शेख असीफोदीन,प्रा.सुनील गोइनवाड, डॉ.सत्वशीला वरगंटे,ग्रंथपाल सुनील राठोड,राजेश पाळेकर,संतोष मोरे, सुनील कंधारकर, नरेंद्र राठोड, गणेश तेलंगे, राजू केंद्रे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!