Thursday, May 14

Saint Janabai is the epitome of Dasyabhava : दास्यभावाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे संत जनाबाई -NNL

परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये त्यांचा जन्म झाला. पुढे त्या पंढरपुरात संत नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे आल्या. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबियांतील एक घटक बनल्या. त्या स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत. विठ्ठलचरणी सर्व जीवन समर्पित केलेल्या जनाबाई यांनी देहभान विसरून दिवसरात्र एक करून संत नामदेवांच्या घरी सेवा केली. त्यांच्यासाठी प्रत्येक कर्मच ब्रह्मरूप झाले होते. त्या विठ्ठलभक्तीत एवढ्या रंगून जाऊन सेवा करत की, विठ्ठल प्रत्यक्ष येऊन त्यांना सेवेत साहाय्य करत असे.

एकदा जनाबाईचे आणि तिच्या शेजारच्या बाईचे शेणाच्या गोवर्‍यांवरून कडाक्याचे भांडण झाले; कारण दोघींनी जवळजवळच गोवर्‍या उन्हात सुकण्यासाठी घातल्या होत्या. त्यांचा हा वाद मिटवण्यासाठी त्याच गावातील पंच तेथे आले. त्यांनी ‘तुमच्या गोवर्‍या कशा ओळखायच्या ?’, असे त्या दोघींना विचारले. तेव्हा जनाबाईने सांगितले, ‘‘ज्या गोवरीतून ‘विठ्ठल’ नामध्वनी ऐकू येईल, ती माझी !’’ त्याप्रमाणे पंचांनी कानाला गोवर्‍या लावल्या तेव्हा खरंच संत जनाबाईंच्या गोवर्‍यांतून ‘विठ्ठल’ नामध्वनी ऐकू आला. आपला नामजप कुठच्या प्रतीचा असला पाहिजे, याची कल्पना या उदाहरणावरून लक्षात येईल.

‘पूर्वकर्मे भोगूनच संपवावी लागतात’, यासंदर्भात संत जनाबाईंच्या जीवनातील प्रसंग !
‘संत जनाबाई एकदा आपल्या पतीस जेवण वाढत होत्या. पहिला घास घेताच पतीने तावातावाने जनीला मारावयास आरंभ केला. भाजीत मीठ का नाही ? तिला हुंदका फुटला, ती विठ्ठलासमोर उभी राहिली आणि म्हणाली, ‘‘विठ्ठला, तू येथे असतांनाही तुझ्या भक्ताला अशा परिस्थितीतून जावं लागतंय. का ?’’
विठ्ठलाने जनीच्या डोक्यावर हात ठेवला. जनीला तिच्या पूर्वजन्माचे स्मरण झाले आणि तो क्षण तिच्या डोळ्यांसमोर आला. तो असा –

‘पूर्वजन्मातील जनी एक राजकन्या होती. गायीसमोर तिने घास ठेवला होता. गाय ते खाण्यास नकार देत होती. जनीने छडी उचलली. तिने गायीवर वळ उठवले; परंतु गायीने ते खाण्यास नकारच दिला…’ विठ्ठलाने जनीच्या डोक्यावरून हात उचलला. जनी भानावर आली.
भगवंत म्हणाले, ‘‘जनी, पूर्वसंचित आणि कर्म फळ कोणाला चुकलेले नाही. हे सर्व भोगूनच या भवसागरातून तरून जावे लागते. तुझी भक्ती या जन्मातील आहे. तेव्हा तुझे सर्व पूर्वसंचित या जन्मी फेडून माझ्या चरणी चिरंतन समाधीत विलीन होशील !’

तात्पर्य : चांगले कर्म करूनही फळ मिळत नसले, तर जनीच्या या कथेने समर्पक उत्तर आपणास मिळेल; पण चांगले कर्म करणे सोडू नका, हेच तुमच्या जीवनाचे ध्येय असावे… !
तुकाराम महाराज म्हणतात,
‘आपणची तारी । आपणची मारी । आपणची उद्धारी । आपणया ।’

संत जनाबाई यांची श्रेष्ठ ईश्‍वरभक्ती दर्शवणारे नि भावविभोर करणारे अभंग !

संत नामदेव हे संत जनाबाईंचे गुरु ! त्यामुळे जनाबाईंनी आपल्या अभंगांची नावे ‘दासी जनी’, ‘नामयाची दासी’ आणि ‘जनी नामयाची’, अशी ठेवली आहेत. या दासीपणाची, स्वत:च्या शूद्र जातीची आणि स्वत:च्या ‘स्त्री’पणाचीही जाणीव व्यक्त करणारे अनेक अभंग संत जनाबाई यांच्या मनातून त्यांच्या शब्दांत उमटले आहेत. विठ्ठलाला मायबाप आणि प्रसंगी ‘सखा’, ‘जिवाचा मैतर’ समजणार्‍या जनीने विठ्ठलाशी त्याबद्दल संवाद साधलेला तिच्या अनेक हृद्य अभंगांतून दिसतो.

संत जनाबाईंचे अनुमाने ३५० अभंग ‘सकल संत गाथा’ या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत. हरिश्‍चंद्राख्यान नामक आख्यानरचना पण त्यांच्या नावावर आहे.

झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ॥१॥
पाटी घेऊनियां शिरीं । नेऊनियां टाकी दुरी ॥२॥
ऐसा भक्तिसी भुलला । नीच कामें करुं लागला ॥३॥
जनी म्हणे विठोबाला । काय उतराई होऊं तुला ॥४॥

भावार्थ : भक्त जना झाडलोट करते. केर मात्र श्रीकृष्ण भरतो. डोक्यावर टोपली घेऊन तो केर दुसरीकडे टाकून येतो. केवळ भक्तीचा भुकेला असलेला हा श्रीहरि हीन कामेही करू लागला. जनाबाई विठोबाला म्हणते, ‘कशी होऊ रे मी तुझी उतराई !’

(देव भावाचा भुकेला असल्याची अनुभूती या अभंगातून येते.)वामसव्य दोहींकडे । देखूं कृष्णाचें रूपडें ॥१॥
चराचरी जें जें दिसे । तें तें अविद्याची नासे ॥२॥
माझें नाठवे मीपण । तेथें कैंचे दुजेपण ॥३॥
सर्वांठायीं पूर्ण कळा । दासी जनी पाहे डोळां ॥४॥

भावार्थ : उजवी आणि डावी दोन्हीकडे मला कृष्णाची रूपे दिसतात. सर्व चराचरामध्ये भगवंत दिसतो. त्यामुळे अविद्या म्हणजे अज्ञान रहात नाही. माझे ‘मी’पणच मला आठवत नाही. तेथे द्वैतभाव कसा येईल ! (संत नामदेवाची) दासी जनी आपल्या डोळ्यांनी सर्वांमध्ये सर्व कलांनी युक्त अशा श्रीकृष्णाला पहाते.

(देव भावाचा भुकेला असल्याची अनुभूती या अभंगातून येते.)
वामसव्य दोहींकडे । देखूं कृष्णाचें रूपडें ॥१॥
चराचरी जें जें दिसे । तें तें अविद्याची नासे ॥२॥
माझें नाठवे मीपण । तेथें कैंचे दुजेपण ॥३॥
सर्वांठायीं पूर्ण कळा । दासी जनी पाहे डोळां ॥४॥

भावार्थ : उजवी आणि डावी दोन्हीकडे मला कृष्णाची रूपे दिसतात. सर्व चराचरामध्ये भगवंत दिसतो. त्यामुळे अविद्या म्हणजे अज्ञान रहात नाही. माझे ‘मी’पणच मला आठवत नाही. तेथे द्वैतभाव कसा येईल ! (संत नामदेवाची) दासी जनी आपल्या डोळ्यांनी सर्वांमध्ये सर्व कलांनी युक्त अशा श्रीकृष्णाला पहाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!