
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | हिमायतनगर तालुक्यातील कारला येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात रविवारी सायंकाळी ह.भ.प. बालयोगी गजेंद्र चैतन्य महाराज यांची प्रभावी कीर्तनसेवा संपन्न झाली. यावेळी त्यांनी तरुणांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आणि संत विचार अंगीकारण्याचे भावपूर्ण आवाहन केले.


कीर्तनात बोलताना महाराज म्हणाले की, “जन्माला आलेला प्रत्येक मनुष्यदेह हा अनंत जन्मांची पुण्याई असून त्याची किंमत लाखमोलाची आहे. मात्र आज अनेकजण दारू, गुटखा, तंबाखूच्या आहारी जाऊन स्वतःचे आरोग्य बिघडवत आहेत. यामुळे लिव्हर, किडनीसारख्या गंभीर आजारांना आमंत्रण मिळते आणि कुटुंबाचा आधारही हिरावला जातो.”

व्यसनमुक्तीचा संदेश
“देह एकदा गेला तर पुन्हा मिळत नाही, त्यामुळे त्याची जपणूक करा. कर्माला घाबरा, व्यसनाधीन होऊ नका आणि परमार्थाचा मार्ग स्वीकारा,” असे सांगत त्यांनी तरुणांना योग्य जीवनमूल्यांची जाणीव करून दिली. महाराज पुढे म्हणाले, “कमावलेली संपत्ती सर्वस्व नाही. संपत्तीमुळे गर्विष्ठ होता कामा नये. देवाचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.” प्रत्येकाने कीर्तन, भजन आणि नामस्मरणातून जीवन समृद्ध करावे, असा संदेश त्यांनी दिला.


संत परंपरा जपण्याचे आवाहन
संतांची शिकवण अंगीकारूनच जीवनाचे खरे कल्याण होऊ शकते, असे सांगत त्यांनी समाजसेवा, चांगले कर्म आणि परमार्थ यांचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. “जीवनात कितीही मोठे व्हा, पण संत विचारांशिवाय जीवन पूर्ण होत नाही,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

या कीर्तन सोहळ्यास कारला गावासह पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, व्यसनमुक्तीचा संदेश सर्वांच्या मनात खोलवर रुजताना दिसत आहे. एकूणच, गजेंद्र चैतन्य महाराज यांच्या कीर्तनातून तरुणांना जीवनमूल्यांचा महत्त्वपूर्ण संदेश मिळाला असून समाजात सकारात्मक परिवर्तनाची प्रेरणा मिळत आहे.



