बिलोली | बिलोली–देगलूर विधानसभा मतदारसंघातील जनता आपली सांस्कृतिक ओळख जपतानाच विकासालाही तितकेच महत्त्व देते, असे प्रतिपादन आमदार जितेश अंतापुरकर यांनी केले. चैनपूर येथे सुमारे ९० लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमास शिक्षण सभापती मिसाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनंत खानापूरकर, सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर, निवृत्त अभियंता साहेबराव जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार अंतापुरकर पुढे म्हणाले की, “ज्या गावात माझे वडील शिक्षणासाठी राहिले, त्या गावाने त्यांना दिलेले प्रेम, स्नेह आणि आपुलकी मी कधीही विसरू शकत नाही. अंतापुर आणि चैनपूर ही दोन वेगवेगळी गावे असली, तरी मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी माझी भूमिका नेहमीच सकारात्मक आणि विकासाभिमुख राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


ग्रामविकासासाठी सातत्याने पुढाकार घेणाऱ्या ग्रामस्थांचे आमदारांनी विशेष कौतुक केले. तसेच भविष्यातही चैनपूरसह संपूर्ण मतदारसंघात आवश्यक असलेली विकासकामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले. यावेळी पार पडलेल्या दिंडी कार्यक्रमासही आमदार जितेश अंतापुरकर यांनी शुभेच्छा देत संस्कृती आणि विकास यांचा समन्वय हाच मतदारसंघाच्या प्रगतीचा मार्ग असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर चैनपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयातही विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

