हिमायतनगर,अनिल मादसवार| सामाजिक वनीकरण आणि महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षित व स्वार्थी कारभारामुळे हिमायतनगर टेभी रत्स्यावर असलेल्या पांडवकालीन अबाबकरच्या माळातून सामाजिक वनीकरण विभागाने लावलेल्या झाडांची मोड – तोड करून जेसीबी मशीन व ४ ते ५ ट्रेकटर व टिप्परच्या सहाय्याने रात्रीला मुरुमाचे उत्खनन करून सुरु असलेल्या रस्ताकामावर टाकले जात आहे. या अवैद्य गौण खनिज उत्खननामुळे पर्यावरणाला हानी पोंचत असून, इतिहासकालीन माळाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.


हिमायतनगर शहरापासून दक्षिनेस असलेल्या टेभी, आंदेगाव, दरेसरसम, पवना रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या इतिहासकालीन आबाबकरचा माळ आहे. सदर माळातुन पांडवकालीन युगात माहूर गडाकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग करण्यात आला होता असे जुन्या जाणकारातून सांगितले जाते. त्यामुळे या माळाला इतिहासकालीन महत्व असून, आजही अनेक जण या माळावर पूजा – अर्चना करण्यासाठी येऊन जेवणाच्या पंगती उठवितात. मागील काळात झालेल्या पावसाने आजघडीला हा माळ हिरवळीने बहराला असून, विविध झाडे, फुलांच्या सुगंधाने दरवळला आहे.


या ठिकाणी मागील १५ वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरण विभागाने वृक्षारोपण केलेली झाडे अस्तित्वात आहेत. त्यामुळे या परिसरात वन्य प्राण्यांना आसरा झाला असताना गेल्या काही वर्षांपासून येथील माळावर विनापरवाना उत्खनन करून दगड, मुरूम काढले गेले आहे. परिणामी 20 ते 30 फुटापर्यंतचे मोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यातील पाण्यात पडून मागील काळात काहींना आपला जीव गमवावा लागला होता. असे असताना आता राजकीय वरदहस्त असलेल्या काही मुरूम चोरांनी माळाच्या मधील भागात जाऊन गेल्या काही दिवसापासुन या ठिकाणी मुरुमांच उत्खनन करून सुरु असलेल्या रस्त्याच्या कमला वापरण्याचा प्रकार सुरु केला आहे. हा माळ वनविभागाकडे येत असला तरी सामाजिक वनीकरण विभागाने लावलेली झाडे असल्याचे सांगून वनविभाग आणि महसूल विभाग हाथ झटकत असल्याने गौणखनिज माफियांना रान मोकळे झाले आहे.




परिणामी सुट्टीच्या दिवशी आणि इतर दिवशी रात्र झाली कि गौण खनिज माफियां धुमाकूळ माजवित असून, जेसीबी मशीनच्या साहाय्याने ४ ते ५ ट्रॅक्टर व २ टिप्परच्या माध्यमातून मुरुमाची विनापरवाना वाहतूक करीत आहेत. काही जागरूक नागरिकांनी याबाबत वाहनधारकांना जाब विचारला तर तुम्हाला काय करायचे असे म्हणत मुरूमाचे सर्रास उत्खनन करून पर्यावरणाला बाधा पोंचविली जात आहे. खरे पाहता गौण खनिज काढण्यासाठी नियमानुसार रॉयल्टी भरून परवाना मिळाल्यानंतर सूर्योदय ते सूर्य मावळण्या पूर्वी उत्खनन करावयाचे असा गौण खनिज आधिनियम आहे. परंतु या सर्व नियमाना बगल देत टेंभीचा माळ खोदल्या जात असल्याने इतिहासकालीन अबाबकरच्या माळाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याकडे जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि तहसीलदार पल्लवी टेमकर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांनी लक्ष देऊन गौण खनिज काढून इतिहासकालीन ठेवा असलेल्या आबाबकरच्या माळातून गौण खनिज उत्खनन करणार्याचा शोध घेऊन कार्यवाही करावी आणि या माळाचे अस्तित्व टिकवून ठेवावे अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरीकातून केली जात आहे.
वन्य प्राण्यांच्या देखील होतात शिकारी
या जंगल परिसरात असलेल्या घोरपड, ससे, हरीण, मोर लांडोर, नीळ आदींच्या शिकारी भी गौण खनिजाची करणाऱ्या तस्करांकडून केली जात असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. गौण खनिजाचे उत्खनन केले जात असताना सामाजिक वनीकरणासह महसूल विभाग याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत. अनेकांनी गौण खनिजबाबतची माहिती संबंधितांना दिली. मात्र याकडे कोणीच लक्ष ना देता एकमेकांवर ढकलून देत असल्याने गौण खनिज माफिया निर्ढावले आहेत. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत या भागातील पर्यावरण प्रेमी नागरिक शेतकरी बोलून दाखवीत आहेत.
