नांदेड| नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने विरोधकांचा पूर्णपणे धुव्वा उडवत बँकेवरील सत्ता कायम राखली. यापूर्वी ११ उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात उर्वरित १२ पैकी १२ जागांवरही पॅनलने विजय मिळवत जिल्हा बँकेवर एकहाती व निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.


या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेची लढत हिमायतनगर मतदारसंघात झाली. माजी आमदार माधवराव जवळगावकर यांनी अवघ्या एका मताच्या फरकाने विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांना धक्का दिला. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून रामचंद्र मुसळे (१०६८), हदगाव-बाभळीकर मतदारसंघातून अनिल पाटील (१०३१) आणि बोधडी मतदारसंघातून ज्ञानेश्वर दहिफळे (९९०) यांनी सर्वाधिक मते मिळवत दमदार विजय नोंदविला.


२६ जुलै रोजी झालेल्या मतदानात १,३४४ पैकी १,२८४ मतदारांनी मतदान करत तब्बल ९५.५४ टक्के मतदानाची नोंद झाली. अर्धापूर, मदखेड, विलोली, भोकर, उमरी, हदगाव, हिमायतनगर आणि माहूर येथे शंभर टक्के मतदान झाले होते. निकाल जाहीर होताच कला भवन परिसरात विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला.



या निवडणुकीसाठी खासदार अशोकराव चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या पुढाकारातून सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनल उभे करण्यात आले होते. बिनविरोध निवडून आलेल्या ११ उमेदवारांसह उर्वरित सर्व जागांवर विजय मिळाल्याने जिल्हा बँकेवरील पॅनलची पकड अधिक मजबूत झाली आहे.
खासदार अशोकराव चव्हाण यांनी या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांच्या मेहनतीला व सर्वपक्षीय समन्वयाला देत, “जिल्हा बँकेत राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देण्याच्या भूमिकेला मतदारांनी कौल दिला आहे,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

