हिमायतनगर,अनिल मादसवार | अतिवृष्टीमुळे झालेले शेतीचे नुकसान, बँकेचे वाढते कर्ज आणि मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च या विवंचनेत अडकलेल्या लक्ष्मण पोतंन्ना पालजवाड (वय ४५, रा. आदेगाव, ता. हिमायतनगर) या शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी सुमारे ३ वाजता घडली.


मिळालेल्या माहितीनुसार, मयत पालजवाड यांच्यावर भारतीय स्टेट बँकेचे सुमारे दोन लाख रुपयांचे कर्ज होते. दोन मुली व एक मुलगा यांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी ते झगडत होते. मात्र यंदाही सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे नाल्यालगत असलेल्या शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले. पिके वाहून गेल्याने शासनाच्या मदतीची अपेक्षा होती. मात्र ती देखील फोल ठरण्याची भीती आणि बैन्केची कर्ज भरण्यासाठी आलेली नोटीस वाढत्या आर्थिक अडचणींमुळे त्यांनी आपल्या शेत सर्वे क्रमांक २४१ मधील पळसाच्या झाडाला बैलाच्या बेरडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

घटनेनंतर ग्रामस्थ व शेतकरी घटनास्थळी धावून आले. तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालय, हिमायतनगर येथे नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. याबाबत हिमायतनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शेतकऱयांच्या या घटनेची शासनाने दखल घेऊन तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आंदेगाव येथील शेतकरी, नगरीकांनी केली आहे.


नातेवाईकांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेली असून शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. उलट बँकांकडून कर्जफेडीसाठी नोटिसा मिळत होत्या. इंजिनिअरिंग शिक्षणासाठी असलेल्या मुलीची फी, इतर मुलांच्या शिक्षणाचा खर्च व घरखर्च भागविण्याच्या विवंचनेतून पालजवाड यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.


