नांदेड l मुंबई ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह संबंधित मंत्री आणि विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता . अखेर या पाठपुराव्याला यश आले असून येत्या 26 ऑगस्ट पासून ही रेल्वे मुंबई – नांदेड आणि नांदेड – मुंबई नियमितपणे धावणार आहे.


वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाचा सोहळा दिनांक 26 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने नांदेडकरांसाठी दिलेली अमूल्य भेट असून याबद्दल खा. डॉ. गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि यांच्यासह ज्यांनी ज्यांनी ही रेल्वे नांदेडला सुरू करण्याचे अनुषंगाने प्रयत्न केले त्यांचेही आभार मानले आहेत.

भारतीय रेल्वेचा अभिमान आणि भारताची स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन – वंदे भारत एक्सप्रेसने – महाराष्ट्रातील मराठवाड्यातून आपला पहिला प्रवास दिनांक 30 डिसेंबर, 2023 पासून सुरु केला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 डिसेंबर, 2023 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जालना ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले होते.


या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – जालना वंदे भारत एक्स्प्रेस चा विस्तार हजूर साहिब नांदेड पर्यंत व्हावा यासाठी खा. डॉ. गोपछडे यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर या विस्तारित गाडीचे उद्घाटन दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात येणार आहे. या करिता एक उद्घाटन विशेष गाडी 26 ऑगस्ट ला चालविण्यात येईल. या उद्घाटन विशेष गाडीचे वेळापत्रक लवकरच घोषित करण्यात येईल.
या विस्तारित गाडीची नियमित सेवा दिनांक 27 ऑगस्ट पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजूर साहिब नांदेड आणि दिनांक 28 ऑगस्ट पासून हजूर साहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अशी सुरु होईल.

गाडी संख्या 20706 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हजूर साहिब नांदेड वंदे भारत एक्स्प्रेस: हि गाडी दिनांक 27 ऑगस्ट 2025 पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून गुरुवार वगळता रोज दुपारी 13.10 वाजता सुटेल आणि दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना आणि परभणी रेल्वे स्थानकांवर थांबून हजूर साहिब नांदेड येथे रात्री 22.50 वाजता पोहोचेल.
गाडी संख्या 20705 हजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेस:
हि गाडी दिनांक 28 ऑगस्ट 2025 पासून हजूर साहिब नांदेड स्थानकावरून बुधवार वगळता रोज सकाळी 05.00 वाजता सुटेल आणि परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि दादर रेल्वे स्थानकांवर थांबून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुपारी 14.25 वाजता पोहोचेल.
ही गाडी हजूर साहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे अंतर 09 तास 25 मिनिटांत पूर्ण करेल. ज्यात एक्झिक्युटिव्ह क्लास आणि चेअर कार मिळून एकूण 20 डब्बे असतील. जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेस मध्ये 8 डब्बे होते. त्यात वाढ करून 20 डब्बे करण्यात आले आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे.
मोदी सरकारचे खा. गोपछडे यांनी मानले आभार
वंदे भारत एक्सप्रेस मुंबईहून नांदेड पर्यंत विस्तारित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा , केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवणीत बिट्टू , राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि ही रेल्वे सुरू करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले त्या सर्वांचेच खा. डॉ. अजित गोपछडे यांनी आभार मानले आहेत.

