मुंबई | राज्यात १७ ते २० मार्चदरम्यान काही भागांत मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. प्रामुख्याने दुपारनंतर आभाळ दाटून येत विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.


सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून, ठिकठिकाणी गारपीटही होऊ शकते. विशेषतः १८ ते २० मार्चदरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.


पुढील काही दिवस शेतकऱ्यांनी हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत, असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.


