नांदेड,अनिल मादसवार| शिक्षणाचे बाजारीकरण वेगाने वाढत असताना नांदेड एज्युकेशन सोसायटीकडून मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या माध्यमातून समाजमन घडविण्याचे सुरू असलेले प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले.


स्वातंत्र्य आंदोलन व हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक प.पू. स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मागील वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा समारोप शनिवार, दि. २४ रोजी भव्य कार्यक्रमात झाला. या कार्यक्रमाला मेधा पाटकर, पुणे येथील आरोग्य सेनेचे संस्थापक डॉ. अभिजित वैद्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी भूषविले.

यावेळी बोलताना मेधा पाटकर म्हणाल्या की, शिक्षणाचे खाजगीकरण मोठ्या प्रमाणात वाढले असून विद्यार्थी संख्या कमी असल्याचे कारण देत सरकारी शाळा बंद केल्या जात आहेत. शिक्षण हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार असतानाही शासनाकडून शिक्षणाचे बाजारीकरण केले जात असल्याने आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. अशा परिस्थितीत स्वामी रामानंद तीर्थ यांनी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे उघडली. गेल्या ७५ वर्षांपासून ही संस्था मूल्याधिष्ठित शिक्षणाची परंपरा जपून पुढे नेत असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रश्न विचारणारे विद्यार्थी घडले पाहिजेत – डॉ. अभिजित वैद्य
शिक्षणाच्या माध्यमातून सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारणारे विद्यार्थी घडविणे हेच शिक्षण संस्थांचे खरे उद्दिष्ट असल्याचे मत डॉ. अभिजित वैद्य यांनी व्यक्त केले. नांदेड एज्युकेशन सोसायटीने ही परंपरा सातत्याने जपली असून विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारण्याची ताकद निर्माण केली पाहिजे, असे ते म्हणाले. संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे राबवावीत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.


कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी लोकसहभागातून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडत असल्याचे सांगत आधुनिक अभ्यासक्रमांचा समावेश शिक्षणात होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष तथा अमृतमहोत्सवी समितीचे कार्याध्यक्ष सीए डॉ. प्रविण पाटील यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा. अशोक सिद्धेवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहसचिव अॅड. प्रफुल्ल अग्रवाल यांनी केले.
कार्यक्रमात ‘युगपुरुष स्वामी रामानंद तीर्थ’ या पुस्तकासह अमृतमहोत्सवी स्मरणिका व अन्य एका पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार पंडितराव देशमुख, गोंडवना विद्यापीठाचे कुलगुरू कल्याणकर, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

