दलित, मागास, आदिवासींचे जगणं कष्टप्रद व अपमानास्पद झाले – अॅड. राजेंद्रपाल गौतम -NNL

नांदेड| या देशात समता प्रस्थापनेचे प्रयत्न समाज सुधारकांनी केले. त्यांच्या कार्याकडे साऱ्या समाजाने दुर्लक्ष केले आहे. धर्माच्या नावावर उच्चनीचतेची उतरंड रचली गेली आहे. दलित, मागास, आदिवासींचे जगणं कष्टप्रद व अपमानास्पद झाले आहे. हे सगळं थांबविण्यासाठी तथागत गौतम बुद्धाचा सम्यक मार्गच दिशा दाखवील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत समाज निर्मितीसाठी व्यवस्थेत नागवलेल्या सर्वच लोकांनी एकत्रित येणे गरजेचे आहे, असे मत दिल्ली सरकारमधील पूर्व कॅबिनेट मंत्री अॅड. राजेंद्रपाल गौतम यांनी व्यक्त केले .

नांदेड येथे शुक्रवार दिनांक १६ डिसेंबर रोजी बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने 22 प्रतिज्ञा सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व भूमिका डॉ. राम वाघमारे यांनी विशद केली. यावेळी त्यांनी राजेंद्रपाल गौतम यांच्या राष्ट्रीय स्तरावरील एकूण कार्याचा लेखाजोखा सांगितला. यावेळी बोलताना राजेंद्रपाल गौतम पुढे म्हणाले की, देशपातळीवर समाजकारण अत्यंत विषारी पद्धतीने वाढत आहे. दलित माणूस आत्मसन्मानाने जगू लागला, वागू लागला तर त्याला ठेचले जाते.

पाण्याच्या घड्याला शिवले म्हणून शाळकरी मुलाची हत्या होते, मिशी ठेवली म्हणून, घोड्यावरून वरात काढली म्हणून मारले जाते. ही जात मानसिकता समग्र राष्ट्रबांधणीच्या कार्यातील मोठा अडसर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न अधुरे राहिले आहे. ते पूर्ण करण्यासाठी आपण काय करतो? कोणत्या दिशा, कोणते कार्यक्रम निश्चित केले आहेत? याचे आत्मपरीक्षण करा असे सांगून आंबेडकरी जनसमूह विस्तारत जाण्यासाठी सांघिक व जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत. भारत बौद्धमय करण्याचा संकल्प आपण केला असून देशभरात ही चळवळ आकार घेत असल्याची त्यांनी म्हटले.

भदंत विनयबोधी यांनी सम्यक जीवनासाठी सम्यक आचरणाची गरज सांगितली. यावेळी त्यांनी केलेल्या धम्मदेसनेत सामाजिक विषयाला स्पर्श करीत व्यक्तिगत रित्या कसे सचोटीने राहणे आवश्यक आहे, याची प्रतिपादन केले. यावेळी त्यांच्यासोबत धम्मसंघ उपस्थित होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशदादा गायकवाड यांनी सद्यस्थितीतील राजकीय घडामोडीचा परामर्श घेतला. व्यक्तिगत जीवनशैलीवर बंधने टाकली जात आहेत. वस्त्राचे रंग वाटून घेतले जात आहेत.

कपडे कोणते घालावेत, काय खावे यावरही बंदी येणार आहे का? आमचे समाज जीवन आमच्या विचाराप्रमाणे, घटनेत दिलेल्या मूलभूत तत्त्वाप्रमाणे जगता येणार नाही का? असा सवाल करून या देशात सत्ता तुमच्या हातात आहे. तुम्ही असुरी आनंद घेऊन नवीन भारत आहे म्हणून सांगता आहात. हा सम्राट अशोकांचा भारत आहे आणि त्यानंतर स्वतंत्र भारत हा संविधानानुसार चालणारा भारत आहे. तो भारत संपवायचा आहे काय? अशा पद्धतीचा सवाल करून लोकांना एकत्र जोडण्याचे आवाहन केले.

शुद्धोधन गायकवाड, डॉ.राम वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. दत्ताहरी धोत्रे, नंदकुमार बनसोडे, मिलिंद चावरे, संजय नरवाडे, बाबुराव कसबे, रोहिदास कांबळे प्रा. जे.टी .जाधव, साहेबराव पवार, किशोर आटकोरे ,भगवान गायकवाड, चंद्रमणी कांबळे ,भारत मगरे, सुधाकर गायकवाड आदींनी या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केलेले होते. कार्यक्रमास जिल्ह्यातील अनेक मान्यवर चिंतक, लेखक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button