HomeनांदेडGhuman Yatra : महाराष्ट्र आणि पंजाब मध्ये ऋणानुबंध निर्माण करणारी एकमेव चळवळ...

Ghuman Yatra : महाराष्ट्र आणि पंजाब मध्ये ऋणानुबंध निर्माण करणारी एकमेव चळवळ : ‘घुमान यात्रा‘ -NNL

महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्याचे अनोखे नाते आहे. राष्ट्र बलिदानाची आणि शेतीनिष्ठ परिश्रमाची पंजाब राज्याची खासियत तंतोतंत महाराष्ट्राशी जुळणारी आहे. या दोन्हीही राज्याच्या ऐतिहासिक संघर्षाची गाथासुध्दा खुपच प्रेरणादायी आहे. त्या सोबतच महाराष्ट्रात धर्मसुधारणेची चळवळ राबविणारे संत नामदेव यांच्या कार्याचा महिमा हा पंजाब आणि महाराष्ट्र राज्यांना जोडणारा आहे. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन पंजाब पर्यंत गेलेल्या संत नामदेवांच्या सातशे वर्षापुर्वी सुरू केलेल्या राष्ट्रीय एकात्मतेच्या चळवळीला पुन्हा उजाळा देण्याचा प्रयत्न दरवर्षी न चुकता होतो ती म्हणजे नानक साई फाऊंडेशनची ‘घुमान यात्रा’ होय.

जेष्ठ पत्रकार तथा नानक साई फाऊंडेशनचे चेअरमन श्री पंढरीनाथ बोकारे यांच्या कल्पनेतुन घुमान यात्रेचे गेल्या १० वर्षांपासून सातत्याने नियोजन होत असते. खर म्हणजे महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातले सांस्कृतिक धागे या निमित्ताने दरवर्षी उकलले जातात. संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांनी ज्या भुमित जवळपास २४ वर्ष वास्तव्य केले, भक्ती मार्ग दाखवला, त्या भुमित जाऊन नतमस्तक होणे हा आनंदच आगळा आहे. दरवर्षी नानक साई फाऊंडेशनच्या माध्यमातून साधारणत: दोनशे भक्त मंडळी पंजाबला जाऊन नतमस्तक होतात. तिथल्या संस्कृतीची ओळख करुन घेतात. तिथला भुभाग प्रदेश जो यापुर्वी अनेक हिंदी सिनेमात पाहिलेला असतो. त्या सरदारांच्या भुमितला दनकटपणा प्रत्यक्ष जाऊन अनुभवतात हा ही आनंद निराळाच असतो.

मुळात पंजाब हरियाणा राज्याबद्ल असलेले आकर्षण म्हणजे अंगावर राष्ट्र भक्तीचा रोमांच आणणारी वाघा बार्डर. भारत पाकिस्तान मधला अनेक वर्षापासूना तणाव आणि त्यातल्या त्यात भारतिय शुर सैनिकांची बलिदानाची गाथा हि सगळकाही रोमांच आणणारी आहे. हि घुमान यात्रा वाघा बाॅर्डरला न चुकता भेटायला देते. राष्ट्र भक्तीची ज्वाला मनात ठेवून तिथल्या जवानांना सेलुट करते. हि यात्रा केवळ यात्राच नाही एक अद्भूत रम्य सहल आणि पंजाबी व मराठी मने जुळवणारी एक चळवळ आहे. विविध वयोगटातल्या मित्रासोबतची मैफिल आहे.

या मैफिलीचा अनुभव घेणे,गुलाबी थंडी अनुभवने हि कल्पनाच आनंद देणारी आहे. हि सहल अमृतसर,वाघा बाॅर्डर,घुमान,कार्तिक स्वामी अचल धाम, लुधियाना, शक्ती पिठ माता नैना देवी, भाक्रानांगल धरण,फत्तेगड साहिब, बस्सिपठाणा, पिपलिसाहीब, महाभारतातील कुरूक्षेत्र, शक्ती पिठ माता भद्रकाली,लव कुश जन्मस्थळ, माता दुर्गा देवी मंदिर,जलीयान वालाबाग,पानिपत युद्धात शहीद झालेल्या मराठा वीरांच्या वंशजांची भेट इत्यादी प्रसिद्ध धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी देत देत उत्तर भारतातील जवळपास सर्वंच निसर्ग सौंदर्य अनुभवते. सोबत अलिशान पंजाबी मेहमाननवाजी यामधुन पंजाब वासीयांचा जिव्हाळा अनुभवायला मिळतो. खरतर हि रम्य सहल अनुभवने आवश्यक वाटते.

या यात्रेचे पंजाब सरकार,घुमानची नामदेव दरबार कमिटी,शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक कमिटी,दिल्ली गुरूद्वारा प्रबंधक कमिटी,निलधारी संप्रदा,सरबत दा भला चॅरिटेबल ट्रस्ट, दम्हेडी व परजियां कलान या खेडेगाव ची गावकरी,पंजाब प्रेस,भाई गनय्या सोसायटी,शिर्डी साई सेवा ट्रस्ट अमृतसर,बाबा नामदेव इंटरनॅशनल फाऊंडेशन, बाबा बंदासिंघ इंटरनॅशनल फाऊंडेशन लुधियाना,सचखंड श्री हजुर साहिब सेवक जत्था लुधियाना,संत नामदेव मंदिर कमिटी नरसी नामदेव यांच्या सह सर्व शिख बांधवांकडुन जोरदार स्वागत केले जाते. विशेष म्हणजे या घुमान यात्रेस नांदेड येथील लंगर साहिब गुरूद्वाराचे मुख्य जत्थेदार नांदेड भुषण संत बाबा  नरेंद्रसिंघ जी व संत बाबा बलविंदरसिंघ जी यांचा कृपा आशिर्वाद लाभलेला आहे. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी हि घुमान यात्रा १५ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. नांदेड सह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातुन भक्त मंडळी सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र आणि पंजाब मध्ये बंधु प्रेम निर्माण करून खरी राष्ट्रीय एकात्मता जोपासणे हा मुख्य हेतू घेऊन ही चळवळ सुरू आहे.. या कार्यास आमच्या मनापासुन शुभेच्छा..

लेखक…. कुलदिप नंदुरकर, 9970609925

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments